नाशिक :  नाशिकला जोडणाऱे रस्ते शेतकऱ्यांच्या रास्तारोकोमुळं आज सकाळपासून जाम झाले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता घोटी बाजार समिती हलवल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी नाशिक-घोटी महामार्गावर रास्तारोको सुरु केला आहे. शिवाय भाजीपालाही रस्त्यावर फेकला आहे.


शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे नाशिक ते सिन्नर रस्ता, सिन्नर ते शिर्डी रस्ता तसंच मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शिवाय कसारा घाटातही वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे.

बाजारासाठी हक्काची सोयीची जागा असावी, घोटी बाजार समितीने बाजार समिती स्थलांतरित केली, कुठलीही सूचना न देता बाजार समिती स्थलांतरित केल्याचं कारण देत शेतकरी आक्रमक झाले आहेत.

गेल्या काही दिवसापासून शेती पिकांना बाजारभाव मिळत नाही. तसंच सरकारी मदत मिळत नसल्याचंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो आणि इतर भाज्या फेकल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.