नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची दिल्लीतील एका व्यापाऱ्यांने ८ ते ९ कोटी रुपयांना फसवणूक केली आहे. या प्रकरणी शेतकरी व्यापाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत. या घटनेमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


द्राक्षाच्या हंगामात उत्तरेकडील राज्यातील व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी नाशिकमध्ये येतात. दिल्ली येथील आझादपूर मंडीमधील आर जेसी ट्रेडिंग कंपनीच्या व्यापाऱ्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला. सुरुवातीला पैसे दिल्यानंतर त्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादित केला. मात्र त्यानंतर व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला आणि त्याबदल्यात शेतकऱ्यांना पैसे दिलेच नाहीत.


शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याशी अनेकदा संपर्क साधण्याच प्रयत्न केला, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. अखेर संतापलेले शेतकरी आझादपूर मंडीत पोहोचले. मात्र त्याचाही काही फायदा झाला नाही. शेतकऱ्यांनी सर्व प्रकार मंडीच्या अधिकाऱ्यांना सांगितला. त्यावेळी व्यापाऱ्याचा केवळ गाळा आणि परवाना रद्द केला जाऊ शकतो, याव्यतिरिक्त काही करता येणार नाही, असं शेतकऱ्यांना समजलं.


अखेर निराश झालेल्या शेतकऱ्य़ांनी व्यापाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.