Nashik Rain Update : नाशिक शहरात अखेर आज (दि. 13) जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली. सकाळपासूनच नाशिकमध्ये दमट वातावरण निर्माण झाले होते. दुपारच्या सुमारास पावसाने नाशिक शहरात जोरदार हजेरी लावली. जवळपास एक तास सुरू असलेल्या पावसाने नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) गुडघाभर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. 


महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाणी साचल्याने अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले. मात्र बहुप्रतिक्षित मान्सूनने (Monsoon) अखेर नाशिक शहरात दमदार हजेरी लावल्याने आता नाशिककर सुखावले आहेत. तर नाशिक शहरात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर जागोजागी पावसाचे पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले आहेत.


पहिल्याच पावसात सरकारी कामाची दैना


तर पहिल्याच पावसात सरकारी कामाची दैना उडाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highway Authority) गलथान कारभारामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. उड्डाणपूलावरील पाण्याचा नाचरा होण्याची व्यवस्था नसल्यानं, उड्डाणपुलावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याला अक्षरशः धबधब्याचे रूप आले आहे. 


उड्डाणपूलाखालून जाणाऱ्या नागरिकांची धांदल


उड्डाणपूलाखाली अर्धवट अवस्थेत पाईप असल्यानं पुलावरील पाणी धोधो रस्त्यावर पडत होते. यामुळे पुलाखालून जाणाऱ्या नागरिकांची धांदल उडाल्याचे दिसून आले. या पाण्यामुळे उड्डाणपुलाखाली काही काळ वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली होती. महामार्ग प्राधिकरणाने पुढील काळात होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी पाण्याचा निचरा होण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. 


1 हजार 307 गाव-वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा


दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील काही भागात मागील आठवड्यात दोन दिवस पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली असली तरी मान्सून अजून सक्रीय झाल्याचे दिसत नाही. तर मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सध्या 366 गावे आणि 941 वाड्या अशा एकूण 1 हजार 307 गाव-वाड्यांना 399 टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ११ जून अखेर केवळ 8.14 टक्के पाणीसाठा (Water Storage) शिल्लक आहे. नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) सध्या 19.45 टक्के पाणीसाठी आहे. तर गंगापूर धरण समुहात एकूण 17.06 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील काही दिवसात मुसळधार स्वरुपात (Rain) पाऊस न कोसळल्यास पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Rain : महाराष्ट्रात खरंच पाऊस विश्रांती घेणार का? पंजाबराव डख यांनी दिली मोठी माहिती


आज कसं असणार राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय?