नाशिक : नाशिकमधून (Nashik) मोठी बातमी समोर येत असून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी राजीनामा दिला आहे. कालच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (hemant patil) यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर आज खासदार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा पक्षाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे. 


दरम्यान काही तासांपूर्वीच खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक (Nashik) शहरातील शिवस्मारकावर सुरु असलेल्या उपोषण स्थळावर भेट दिली होती. यावेळी मराठा आंदोलकांनी (Maratha Reservation) त्यांना घेराव घालत राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर काही वेळातच खासदार हेमंत गोडसे यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल झाले असून त्यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीवर आपला राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिकमधून पहिल्यांदा हेमंत गोडसे यांनी आपला राजीनामा दिला असून लवकरात लवकर मराठा बांधवाना आरक्षण द्यावे, अशी मागणी राजीनाम्याद्वारे करण्यात आली आहे. मात्र कोणत्याही खासदाराचा राजीनामा हा लोकसभा अध्यक्ष किंवा लोकसभा सचिवालयकडे द्यायचा असतो, मात्र हेमंत गोडसे यांनी पक्षाचे प्रमुख म्ह्णून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. 


मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा सत्र सुरूच असून कालच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता.  त्यानंतर बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनीही मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहित आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर आज हेमंत गोडसे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वीच गोडसे हे नाशिक येथील मराठा आंदोलकांच्या उपोषणस्थळी दाखल झाले होते. यावेळी आंदोलकांनी गोडसे यांना समाजासाठी तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या, तुम्हाला आम्ही पुन्हा निवडून आणू असे सांगितले. यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी केली आहे.


काय म्हटलंय पत्रात?


आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाच्या भावनांचा होणारा उद्रेक पाहून मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देत आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन मराठा समाज आरक्षणासाठी झटत आहे. आरक्षण नसल्याने शिक्षण आणि नोकन्या मिळणेकामी मराठा समाजातील मुलांची मोठी कुचंबना होत आहे. मागील आठवड्यापासून पुन्हा आरपारच्या लढाईसाठी समाजातील कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. यामुळे राज्यभरातील तमाम मराठा समाजामध्ये आता आरक्षण मिळालेच पाहिजे, आता नाही तर कधीच नाही अशी तीव्र भावना निर्माण झाली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या जरांगे पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असल्याने मराठा समाजाच्या भावनांचा आता राज्यभर उद्रेक होऊ लागला आहे. मराठा समाजाच्या तीव्र भावना विचारात घेऊन मी आपल्या पक्षाचा लोकसभा सदस्य असल्यामुळे माझ्या खासदारकीचा राजीनामा आपणांकडे सादर करीत असल्याचे पत्रात म्हटले आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांनी दिला थेट राजीनामा