Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात रेल्वे नाही. गावातली लोक सांगतात कि आपल्या गावचा रेल्वे मंत्री (Railway Minister) असून गावात रेल्वे नाही. हे ऐकल्यावर खूप त्रास होतो. मात्र पहिल्यांदा देश मग राज्य विकसित करण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी नाशिकमध्ये केले. 


मंत्री रावसाहेब दानवे हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी नाशिकमध्ये (Nashik) होते. त्यांनी भगूर येथील वीर सावरकर यांच्या सावरकर वाड्याला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, तिरंगा झेंडा आपण फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला बघतो, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच घरांवर तिरंगा फडकला पाहिजे अशी संकल्पना मांडली आणि आज घरांघरांवर तिरंगा फडकत आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांनीच बलिदान दिले, घरदार सोडलं, संसाराची राख रांगोळी झाली, अशांनी बलिदान दिले, त्यांचीही आठवण काढली पाहिजे, लोकांच्या पुढे त्यांचं बलिदान मांडल पाहिजे, त्यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. याचसाठी आज नाशिकमध्ये चिमुकल्यासह सर्वच जण तिरंग्यासाठी फेरीत सहभागी झाले आहेत. 


यावेळी दानवे यांनी खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी उल्लेख केलेल्या पंचवटी एक्सप्रेस संदर्भात बोलत असताना म्हणाले कि, रेल्वेचे कामकाज करणे सोपे नाही. 'आप्पा आम्ही कुठं जन्माला आलो, आमचा विचार करा कधीतरी'. 'तुम्ही तर काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली माणसं, सोन्याच्या फरशीवर लहानपण गेलंय तुमचं.' मात्र आम्ही खूप संघर्ष पहिला आहे. गेली 35 वर्ष राजकारणात आहे, आज जनतेच्या कृपेने रेल्वे मंत्री आहे, मात्र माझ्याच गावात आज रेल्वे नाही. गावातली लोक नेहमीच बोलत असतात याचा खूप त्रास असल्याचे रावसाहेब यांनी सांगितले. 


ते पुढे म्हणाले अनेकजण बोलतात की रेल्वे प्रवास मोफत होणे आवश्यक आहे. मात्र तुम्ही एखाद्यावेळी मुबंईला फिरायला आलात तर तेव्हा एक रुपयाचं तिकीट काढतात, त्या तिकिटासाठी रेल्वे प्रशासन 55 पैसे देते असते. ग्राहकांचे 45 पैसे मिळून ते तिकीट दिले जाते. त्या एक रुपयाच्या तिकिटातून तुम्ही मुंबई फिरून येतात, असं मुंबई तिकिटाचे रावसाहेब दानवे यांनी गणितचं मांडले. ते म्हणाले. आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत. मात्र देशातील गरिबी नरेंद्र मोदींच्या काळात कमी झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते 2014 पर्यंत भारतात गरिबी होती. त्यानंतर देशातील गरिबांनी एकत्र यायचं ठरविले. आणि सर्व गरीब एकत्र झाल्यानंतर देशात गरिबांचा प्रधान मंत्री झाला.


हर घर तिरंगा मोहीम 
तिरंगा झेंडा आपण फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला बघतो, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच घरांवर तिरंगा फडकला पाहिजे अशी संकल्पना मांडली आणि आज घरांघरांवर तिरंगा फडकत आहे. इतिहासाची उजळणी करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळं मोदींनी ही संकल्पना मांडली, त्या त्या गावातले स्वातंत्र्य सैनिकांचे सन्मान करण्यास सांगितले आहे. शिवाय सर्व केंद्रीय मंत्री भेट देत आहेत, आपल्या देशाचा मंत्री स्वातंत्र्याचा इतिहास प्रत्येक पुढे ठेवत आहे. मागील 75 वर्षांत काय गमावलं, काय नुकसान झालं, याचा लेखा जोखा मांडणं आवश्यक असल्याने हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे.