Nashik Rain : नाशिक (Nashik) शहर परिसरासह जिल्ह्यातील काही भागात अधून मधून संततधार (Rain) सुरूच असल्याने गंगापूर धरणांतून (Gangapur Dam) 5 हजार क्यूसेकने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


नाशिकसह जिल्ह्यातील काही भागांत आज पहाटेपासून जोरदार पावसाला (Heavy Rain) सुरवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात ऊन ढगाळ वातावरण पाऊस अशी स्थिती पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर व गंगापूर (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नदी नाल्याना काही प्रमाणात पूर आला आहे. तर नाशिक शहरात ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. तर आज सकाळपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटांच्या परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. 


नाशिकमध्ये गणेश विसर्जनानंतर (Ganesh Immersion) पावसाचा जोर वाढला आहे. मात्र दिवसभरात कधी उन तर कधी पाऊस असे वातावरण पाहायला मिळतहोते. मात्र काल सायंकाळपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी कायम आहे. कधी रिमझिम, कधी हलक्या सरी, तर कधी अचानक पडणाऱ्या जोरदार सरींमुळे शहरात वातावरणात गारवा आहे. 


त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार
दरम्यान गंगापूर पाणलोट क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर, गिरणारे परिसरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. तसेच अंबोली, वेलुंजे आदी परिसरात पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून नाशिक शहरात मात्र अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर आज पहाटेपासून मात्र पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान नाशिक शहरात पाऊस सुरूच असून जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) पट्ट्यात पावसाची सत्ताधार सुरूच आहे. पुढील तीन दिवस देखील यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 


गंगापूर धरणातून विसर्ग 
दरम्यान जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर टिकून असल्याने आज सकाळी 10 वाजता 2000 क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. त्यानंतर अकरा वाजेपासून 5000 क्युसेकने गंगापूर धरणातून विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदी काठच्या गावांसह घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  पावसाचा जोर सतत राहिल्यास टप्याटप्याने विसर्ग वाढण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 


नाशिकला यलो अलर्ट
परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून काही दिवस तीव्रता अधिक राहील, असे हवामान तज्ञांनी म्हटले आहे. दोन दिवसांपासून मुंबईसह पुणे, रायगड, रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, वर्धा आणि बुलढाणा या जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. येत्या तीन दिवसांतही मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईत सकाळच्या सुमारास ऊन येते आणि सायंकाळनंतर आभाळ भरून पाऊस सुरू होतो असे वातावरण आहे. नाशिक आणि पालघर जिह्यालाही हवामान खात्याने यलो ऍलर्ट (Yellow Alert)  जारी केला आहे.