Nashik Ajit Pawar : नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशनात (Winter Session) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजीराजे (Chatrapati SambhajiRaje) धर्मवीर नव्हते, असे विधान केले. त्या विधानानंतर आज शिंदे गट व भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.


राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून विविध नेत्यांनी केलेल्या महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यांमुळे हा राजकीय मुद्दा बनून गाजत आहेत. सत्ताधारी मंडळींविरुद्ध विरोधकांनी याच मुद्द्यावरून रान पेटविले आहे. त्यातच आता अजित पवार यांच्या विधानाची आयतीच संधी सत्ताधारी मंडळींना मिळाली आहे. त्यामुळे केवळ निषेध करण्यापेक्षा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय भाजपसह शिंदे गटाने घेतल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik0 शहरात रविवार कारंजा येथे सकाळी दहा वाजता व दुपारी 12 वाजता मुंबई नाका येथे दोन ठिकाणी निदर्शने करण्यात आली. तर बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाच्या (Shinde sena) वतीने देखील नाशिकच्या शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयात आंदोलन करण्यात आले. 


दरम्यान शिंदे गटाचे नाशिक महानगरप्रमुख प्रवीण तिदमे म्हणाले कि, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्‍हते असे अवहेलना करणारे वक्‍तव्‍य केले. त्‍यांच्‍या वक्‍तव्‍यामुळे शिवप्रेमींच्‍या भावना दुखावल्‍या गेल्‍या आहेत. या वक्‍तव्‍याबद्दल त्‍यांनी माफी मागावी, अशी मागणी समाजघटकांतून पुढे आली आहे. त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध करण्‍यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. यापूर्वी राज्यपाल व इतर नेत्यांनी जेव्हा आक्षेपार्य वक्तव्य केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेचा, विधानाचा निषेध केला होता. म्हणूनच कोणताही नेता असो अशाप्रकारे भावना दुखावणार असतील तर निषेध होणारच असा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली. 


यावेळी अजित पवार हाय हाय, अजित पवार यांचा निषेध असो, अशी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनात उपस्थित महिलांकडून आंदोलनात वापरण्यात आलेल्या बॅनर वर असलेल्या अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. त्याचबरोबर अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्‍या वक्‍तव्‍यावरुन समाजातील विविध घटकात तिव्र पडसाद उमटत आहेत. वास्‍तविक पवारांनी त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याबद्दल माफी मागीतली पाहिजे होती. परंतु, तसे काहीच न घडल्‍यामुळेच कार्यकर्त्‍यांना आता रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्‍याची वेळ आली आल्याचे भाजप आंदोलकांनी सांगितले. एकीकडे शिंदे गटाचे आंदोलन झाल्यानंतर इकडे रविवार कारंजानंतर मुंबई नका परिसरात भाजपच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. अजित पवार यांनी केलेल्या विधानावर ताशेरे ओढत पवारांनी माफी मागावी अशी मागणी भाजप आंदोलकाकडून करण्यात आली. 


अजित पवार काय म्हणाले होते?
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं. संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची मागणी करताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले होते.  विधानसभेत बोलत असताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भाष्य केले होते. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती.