Nashik Hanuman Birth PLace : नाशिकच्या (Nashik) अंजनेरी हनुमान जन्मस्थळाबाबतचा (Hanuman Birth Place) वाद अद्यापही कायम आहे. गोविदानंद आपल्या भूमिकेवर ठाम राहुन गुजरातला रवाना झाले. यानंतर आज अंजनेरीच्या साधू महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शास्रार्थ सभेत माईक उगारणाऱ्या महंतांचा सत्कार करण्यात आला. 


गेल्या आठ दिवसांपासून कर्नाटक येथील किष्किंदाचे गोविंदानंद महाराज यांनी हनुमान जन्मस्थान हे अंजनेरी नसून किष्किंदा नागरी असल्याचा दावा केला. यानंतर हा वाद चांगलाच पेटला. हनुमान जन्मस्थळ वादावर तोडगा काढण्यासाठी शास्रार्थ सभेचे आयोजनही करण्यात आले. मात्र शास्रार्थ सभेची सुरवात वादाने झाली आणि शेवटही वादानेच झाला. यामुळे तीन ते चार तास चाललेल्या या वादातून काहीही निष्पन्न झाले नाही. शिवाय पोलिसांना या वादात मध्यस्थी करावी लागली. 


दरम्यान शास्रार्थ सभेतून हनुमान जन्मस्थळाचा वाद मिटला तर नाहीच शिवाय गोविदानंद महाराजांनी पत्रकार परिषद घेत किष्किंदा हेच अंजनेरी जन्मस्थान असल्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. यावेळी त्यांनी नाशिकरांना किष्किंदा नगरीत दर्शनासाठी येण्याचे  निमंत्रण देत ते गुजरातला रवाना झाले. यानंतर आज नाशिक त्र्यंबकेश्वरचे साधू महंत विचार मंथनासाठी एकत्र आले असून अंजनेरीत बैठक घेण्यात आली. यावेळी शास्रार्थ सभेत गोविदानंद महाराज यांच्यावर माईक उगारणाऱ्या महंतांचा सत्कार देखील करण्यात आला. 


अंजनेरी हनुमान जन्मस्थळ वादाचं पुढं काय? 
गेल्या काही दिवसांपासून अंजनेरीच्या हनुमान जन्मस्थळाबाबतचा वाद चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळाले. शास्रार्थ सभेतील गोंधळ, मानापमान नाट्य, साधू महंतांची हमरी तुमरी यामुळे शास्रार्थ सभा झालीच नाही. शिवाय हनुमान जन्मस्थळ वाद बाजूलाच राहिला. त्यानंतर गोविदानंद महाराज यांची पत्रकार परिषद, त्यानंतरही आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे सांगून गुजरातकडे रवाना झाले. मात्र अंजनेरी हनुमान जन्मस्थळ वादाचं पुढं काय असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. 


अनेक वर्षांची परंपरा 
अंजनेरीचे हनुमान जन्मस्थळ गेल्या अनेक वर्षांपासून सर्वदूर परिचित आहे. अंजनेरी पर्वताला लागूनच हे गाव वसलेले असून गावात हनुमानाची भव्य मूर्ती असल्याचे पाहायला मिळते. देशभरातून भाविक भक्तांची वर्दळ या ठिकाणी असते. हनुमान जयंतीचा उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे अंजनेरीच्या हनुमान जन्मस्थळाबाबत वाद न करणे आवश्यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.