नाशिक : नाशिकसह (Nashik) जिल्हाभरात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने (Rain Update) त्याचा थेट परिणाम खरिपाच्या लाल कांद्याच्या लागवडीवर  झाला आहे. महागड्या कांद्याचे उळे पेरून रोपं तयार केली. दोन महिने जतन करून आता लागवडी योग्य झाले. मात्र पाऊस नसल्याने रोपं पिवळे पडू लागली असून लाल कांद्याची लागवडही खोळंबली आहे.


नाशिकसह (Nashik) धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर आदी जिल्ह्यातही पावसाने ओढ दिली असून (Rain Update) अनेक भागात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नसल्याने नद्यांना पहिला पूरसुद्धा आलेला नाही. अशातच सुरुवातीच्या पावसावर शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली असून त्यातच पाऊस गायब असल्याने अनेकपिके कोमेजून जाऊ लागली आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी नाशिक जिल्ह्यातील (Nashik Farmers) शेतकरी हे कांद्याच्या लागवडीत व्यस्त असतात. ही लागवड ऑगस्टमध्ये करण्यासाठी त्यांची रोपे हे जूनच्या पहिल्या आठवड्यातच टाकावी लागतात. विहिरीतल शिल्लक पाण्यावर बळीराजाने महागडे उळे ( बी ) पेरून कांद्याची रोपे तयार केली. 


दरम्यान पाऊस नसल्याने अनेक भागात शेती टँकरवर (Water Tanker) तग धरून आहे. पाणी कमी पडल्याने टँकरद्वारे ही पाणी दिलं जात असून त्यावर फवारणी करत दोन महिन्यापासून ते रोपे जपली आहेत. आता कांदा लागवड करण्याची योग्य वेळ आल्याने कांदा लागवडीसाठी शेत तयार करण्यात आली. मात्र पावसाअभावी कांद्याची लागवड करणे अशक्य झाले आहे. कांद्याची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचे लाल कांदा हेच मुख्य नगदी पीक असून या लाल कांद्यावरच इथले सगळे अर्थकारण अवलंबून असते. मात्र या ठिकाणी पावसाने पाठ फिरविल्याने कांदा लागवडीस अडचणी येऊन येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे.. त्यातच अगोदरच पेरणी केलेली मका, बाजरी, मुग, भुईमूग यांसारखी पिके देखील पाण्या अभावी सुकायला लागली आहेत. 


 कांद्याचे गणित बिघडण्याची शक्यता


नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 569.4 मिलिमीटर पावसाची नोंद होत असते.यंदा मात्र ते प्रमाण 355.7 मिलिमीटरपर्यंत इतके खाली आहे..म्हणजे सरासरीच्या 214 मिलिमीटर इतका कमी पाऊस झाला आहे..तर कांदा लागवडीसाठी रोपवाटिका क्षेत्र 3167.60 हेक्टर इतके क्षेत्र असून केवळ 662 हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड झाली आहे. दरम्यान, पाऊस नसल्याने लाल कांद्याच्या लागवडीसाठी उशीर होणार आहे. अजून दहा ते पंधरा दिवस पाऊस आला नाही तर रोपेही वाया जातील अन् कांद्याचे गणित बिघडण्याची दाट शक्यता असून कांदा रोपांच्या टंचाईसह खरीपाच्या लाल कांद्याचा हंगाम देखील लांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे..


 


इतर संबंधित बातमी : 


Saat Barachya Batmya: पावसाअभावी कांदा लागवड थांबली; दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा :ABP Majha