Nashik News : गेल्या काही दिवसांपासून हवेत गारठा असल्याने सकाळी नऊपर्यंत घराबाहेर निघणे कठीण झाल्याचे चित्र आहे. अशातच आज अचानक पारा खाली गेल्याने नाशिकसह जिल्ह्याला हुडहुडी भरली. आज नाशिक शहरात 8.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर निफाडमध्ये अवघ्या 5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. 


नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणाने वेढा घातला होता. कालपासून वातावरण निवळले असले तरी किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही घसरण झाली असून शीतलहरींमुळे दिवसाही नागरिकांना गारव्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजेपर्यंत घरातून बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे.  दिवसभर स्वेटर आणि रात्री शेकोटीचा आधार नागरिक घेत आहेत. तर अचानक पारा घसरून 8.7 अंशावर पोहचला आहे. जिल्ह्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला यंदाच्या हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे, अवघ्या 5 अंशावर पारा घसरला आहे. 


दरम्यान थंडीची सुरुवात झाल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात बोचरा थंडीचा अनुभव नाशिककरांनी घेतला. मात्र मागील काही दिवसांपासून किमान तापमान वाढले असले तरी कमाल तापमानात मात्र घसरण पाहायला मिळत होती. म्हणजेच सकाळी नऊ वाजेपर्यंत हवेत गारवा असल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. सलग दोन दिवस सकाळी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले आहे. मात्र दिवसाही शीतलहरींमुळे वातावरणात गारवा जाणवत असल्याने थंडीचा कडाका जाणवत होता. मात्र शहरासह जिल्ह्याचे तापमान घसरले असून बोचऱ्या थंडीचा अनुभव नाशिककरांना मिळत आहे. त्यामुळे सकाळपासून घातलेला स्वेटर दिवसभरही परिधान करावा लागत आहे. 


निफाड नीचांकी तापमानाची नोंद 


दोन दिवसांपूर्वीपर्यंत नाशिकमधील 15.4 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले होते. तर काल हेच तापमान 13.0 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असताना सोमवारी म्हणजेच आज त्यात पाच अंशांची घसरण झाली. त्यामुळे हे तापमान 8.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान निफाडच्या पारा चांगलाच घसरला असून आज नाशिकसह निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील निचांकी तापमानाची आज नोंद करण्यात आली आहे. आज निफाड 5 अंशावर येऊन पोहचले असून तर नाशिक 8.7 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हवेत गारवा असल्याने प्रचंड थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे. 


सर्दी, खोकला वाढला... 


गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात ढगाळ वातावरण असल्याने शिवाय दिवसादेखील हवेत प्रचंड गारवा जाणवत आहे. यामुळे शहरात सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे दवाखान्यात गर्दी वाढत असून  बदलामुळे व्हायरल फिवर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ढगाळ वातावरणामुळे आतांनी तापमानात घसरण होत असल्याने आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. यासाठी घराबाहेर पडताना उबदार कपडे, पाणी पिताना कोमट पाण्याचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा असे आवाहन डॉक्टरांकडून देण्यात येत आहेत.