Nashik News : त्र्यंबकेश्वराच्या (Trimbakeshwer) पिंडीवर बर्फाचे थर जमा झाल्याची बातमी सोशल मीडियातून  झळकत आहे. मात्र पिंडीवर बर्फ जमा होणे ही पूर्णतः नैसर्गिक प्रक्रिया आहे. वातावरणातील तापमानाची घट हे त्यामागील प्रमुख कारण असल्याची माहिती नाशिक (Nashik) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या संदर्भात खुद्द मंदिर पुजाऱ्याने देखील याबाबत बर्फ तयार झाल्याचे सांगितले. मात्र हे कशामुळे होत आहे, याबाबत अद्याप काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.


त्र्यंबकेश्वर येथील जोतिर्लिंगा ची बारा जोतिर्लिंगांपैकी आद्य जोतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. त्र्यंबकेश्वर ला लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग हे प्रचलित असल्याने देशभरातून भाविकांची रेलचेल असते. दरम्यान मंदिर गाभार्यातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याच्या घटनेने सोशल मीडियात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. मात्र ही नैसर्गिक घटना असून हा काही चमत्कार नाही, असे स्पष्टीकरण नाशिक अंनिसने केले आहे.


स्थानिक काय सांगतात...!
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात नेहमी जाणाऱ्या एका स्थानिक नागरिकाने सांगितले कि, इतर ठिकाणच्या मंदिरात आढळून येणाऱ्या पिंड हि वरच्या बाजूला असते. मात्र त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंड हि आतमध्ये असून एक फूट खड्डा आहे. या यात ब्रह्म विष्णू महेश यांच्या पिंडी आहेत. या पिंडीवर सातत्याने गोदावरी नदीचे उगमाचे पाणी पडत असते.मी त्याचबरॊबर भाविकांनी वाहिलेले दूध, किंवा इतर दिवशी केलेला अभिषेक यामुळे सातत्याने पडणाऱ्या पाण्यामुळे ते भरलेले असते. आणि याचमुळे गारवा निर्माण होऊन बर्फाचे गोळे तयार झाले असावेत, असे या नागरिकांनी सांगितले. 


अंनिसच्या वतीने आवाहन
कोणताही दैवी चमत्कार किंवा चांगले-वाईट घडण्याचे दैवी संकेत नाहीत. भाविकांनी आणि सामान्य नागरिकांनी अशा नैसर्गिक घटनांना चमत्कार समजू नये. मुळात चमत्कार कधीच घडत नसतात. एक तर अशा नैसर्गिक घटनांमागील कार्यकारणभाव समजून घेण्याची तसदी आपण घेत नाहीत आणि काही नागरिक चमत्काराच्या माध्यमातून समाजात अफवा पसरवण्याचे काम करत असतात. म्हणून लोकांनी अशा अफवांवर अजिबात  विश्वास ठेवू नये.  तसेच संबंधित  पोलीस प्रशासनानेही याची तातडीने दखल घेऊन, अफवा पसरविणाऱ्यांवर तातडीने  कायदेशीर कारवाई करावी, असे अंनिसच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.


हे आहे कारण 
नाशिक अंनिसच्या नुसार सामान्यपणे गाभार्‍यातील तापमान आणि बाहेरचे तापमान यामध्ये १२ ते १३ अंशापर्यंत तफावत असते. साहजिकच गाभाऱ्यातील बाष्पयुक्त हवेला थंडावा मिळाल्याने आणि पिंडीचा भाग गुळगुळीत असल्याने तेथे बर्फाचे लहान लहान थर जमा होतात.रात्रीच्या वेळी तापमानात अधिक घट झालेली असते. त्यामुळे पहाटेच्या वेळी बर्फ तयार होण्याचे प्रमाण वाढते .