Pitru Paksh 2022 : पितृपक्षात (Pitru Paksha) आर्थिक व्यव्यहार शक्यतो केले जात नाहीत, मात्र ह्याच पितृपक्ष त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील नागरिकांसाठी फलदायी ठरतो आहे. पिंडाला काकस्पर्श होवो अथवा ना होवो, त्र्यंबकेश्वर नगरीचे अर्थकारण मात्र रुळावर आले असून मागील दोन वर्ष कोरोनाचा (Corona) फटका बसल्यानंतर आता त्र्यंबकेश्वर नगरीत रेलचेल दिसून येत आहे..


त्र्यंबकेश्वर नगरीत भाविकांची ही गर्दी दोन वर्षानंतर पाहायला मिळते आहे. कोरोना काळात सर्व व्यवहार बंद झाले होते. पूजापाठ धार्मिक विधींना परवानगी नसल्यानं आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती.. यंदा मात्र सरकाने निर्बंध हटविल्याने श्रावण महिन्या पाठोपाठ पितृपक्षात भाविकांचा ओघ बघायला मिळतो आहे. त्रिपिंडी, नारायण नागबली या पूजासाठी देशभरातुन भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होत आहेत. त्यामुळे दोन वर्षांचा बॅकलॉग भरून निघतो आहे. पुरोहित, हॉटेल व्यवसायिक, पूजा साहित्य, फुल प्रसाद विक्रेते, नाभिक, खाजगी सर्वजनिक वाहतूक या साऱ्यांनाच रोजगार प्राप्त झाला  असून अर्थचक्र गतिमान झाले आहे. 


कालसर्प शांती, नारायण नागबली, त्रिपिंडी ह्या पूजा त्र्यंबकेश्वर नगरीत वर्षभर तिथीनुसार केल्या जातात. पितृपक्षात मात्र हि संख्या दुपटीने वाढलेली असते. त्र्यंबकेश्वरमध्ये देशभरातून दररोज हजारो भाविक दाखल होतात.  बहुतांश भाविक नारायण नागबली, त्रिपिंडी पूजा करतात, या माध्यमातून दिवसाकाठी लाखो रुपयांची उलाढाल होते आहे. कालसर्प शांतीला 2100 ते 3000 नारायण नागबलीला 5 ते 8 हजार आणि त्रिपिंडी साठी 3 हजारापर्यंत खर्च येतो. यात काही भाविकांची गुरुजींच्या घरी राहण्या खाण्याची सोय असते. अन्यथा 300 रुपया पासून तर 1500 रुपयांपर्यंतच्या रूम्स उपलब्ध आहेत. मुंडन करण्याचे  साधारण 100 रुपये दर आहे. प्रसाद पूजा साहित्य 10 रुपया पासून तर शंभर दीडशे रुपया पर्यंत भाविकांकडून घेतले जातात. नारायण नागबली पूजेसाठी घेतली जाणारी पांढरी वस्त्र साडेतीनशे रुपयात मिळतात. त्यासाठी अंतर्वस्त्र, रुमाल घ्यायचे असतील तर  तोच आकडा 500 रुपयांपर्यंत जातो. तर वाहनाच्या नगर प्रवेशासाठी 50 ते 150 रुपयाचं शुल्क आकारले जाते. त्यापोटी दिवसाकाठी हजारो रुपयांचे उत्पन्न ठेकेदाराच्या माध्यमातून नगरपरिषदेला मिळत असल्यानं पितृपंधरवड्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. .


श्रध्येपोटी हजारो किलोमीटरचा प्रवास करून भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत येत असतो. पूजा केल्यानं सुख शांती, नांदते स्थिर्य लाभते अशी भाविकांची भावना आहे.  त्यामुळे भाविकांचे  पूर्ण समाधान झाले होणे गरजेचे आहे. त्र्यंबकेश्वर नगरीचेही लोकसंख्या साडेतेरा ते चौदा हजारच्या आसपास आहे. इथे दिवसाकाठी 20 ते 25 हजार भाविक येत असतात. त्यामुळे अस्वछतासह नागरी सुविधांवर ताण पडतो. दर बार वर्षांनी कुंभमेळा भरत असल्यानं त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी होत आहे. पितृ पक्षात नवीन आर्थिक व्यव्यहार करत नाहीत. शुभ कार्यासाठी पितृ पंधरवड्या नंतरचा मुहूर्त शोधतात, मात्र हाच पितृ पंधरवडा त्र्यंबकवासियांना गेल्या अनेक पिढ्यापासून धार्जिणा ठरतो आहे.