Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यासह विभागात सध्या पेरणीसह शेतीच्या कामांनी (Farming) जोर धरला आहे. यांसाठी कृषी सेवा केंद्रात खते, बियाने खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाकडून तब्बल 57 भरारी पथकांची विभागात स्थापना केली आहे. या पथकाने एप्रिल ते जुन 2023 तीन महिन्यात केलेल्या विक्री केंद्रांच्या तपासणीत अनाधिकृत व शासनाने प्रतिबंधित केलेल्या कामे होत असल्याप्रकरणी तब्बल 79 विक्री केंद्रांचे परवाने निलंबित (Suspended) केले आहेत. 


दरवर्षी शेती कामांना वेग आल्यानंतर खते बियाणे विक्रीत (Fertilizer seed sales) मोठी उलाढाल होत असते. हजारो लाखो शेतकरी शेतीसाठी खतांची, बियाणांची खरेदी करत असतात. याच पार्श्वभूमीवर विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्यासह विभागात भरारी पथकाकडून कारवाई सुरु आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचा कृषी विभाग (Nashik Agri Departement) अलर्ट मोडवर आहे. फसवणुकीचे प्रकार थांबवण्यासाठी तब्बल 57 भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. विभागात खते विक्री केंद्रांची संख्या 7 हजार 157 एवढी असून 7 हजार 747 बियानांची तर 6 हजार 572 किटकनाशकांची विक्री केंद्रे आहेत. त्या सर्वांवर भरारी पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहेत. बोगस बियाण्यांची एन्ट्री होऊ नये म्हणून, बियाण्यांच्या बोगसगिरीवर सुद्धा पथकाची नजर आहे. 


दरम्यान यंदा काहीसा पाउस लांबल्याने नाशिक जिल्हयासह विभागातील पेरण्या उशीराने सुरु झाल्याचे चित्र होते. मात्र मागील काही दिवसांपासून पेरण्यासह शेतीच्या कामांना गती आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर मोठी गर्दी होत आहे. याचा काही विक्रेते फायदा घेत असल्याच्या तक्रारी भरारी पथकाला निदर्शनास आल्या असता, अशा कृषी विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून सर्वाधिक खरेदी केली जाते. कृषी विभागाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात खत विक्री केंद्रांची तपासणी सुरू असून अनियमितता आढळून आल्यास विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही केली जात आहे. बोगस खते, बियाणे व विना परवाना खते, प्रतिबंधित केलेली बियाणे व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या तब्बल 79 केंद्रांवर निलंबनाची कारवाइ करण्यात आली आहे. या विक्री केंद्रात टाकलेल्या छाप्यात 81 मेट्रीक टन खते व 245 क्विंटल बियाणे असा एकुण 61 लाखांचा माल जप्त केला. विभागात एकुण 21 हजार 475 खते, बियाणे व किटकनाशक विक्री केंद्र असून आतापर्यत सत्तर टक्याहून अधिक केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे.



79 केंद्रांचे परवाने निलंबित


गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून खते, बियाणे व किटकनाशकांचे नमुने तपासली जातात. यंदा घेतलेल्या खतांच्या 568 नमुन्यापैकी 21 नमुने अप्रमाणित आले. बियानांचे 1 हजार 232 लाक्षांक असताना 1 हजार 466 असे उद्दिष्टापैकी नमुने गुणवत्ता विभागाकडून घेतले. यावेळी 13 नमूणे अप्रमाणीत आढळ्ले. तर किटकनाशकांचे 253 नमुने घेतले त्यात 3 नमूने अप्रमाणीत आढळ्ले. अप्रमाणित नमुने आढळ्ल्याप्रकरणी 37 जनांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच या कारवाईत 48 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित तर 5 परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत. बियाणे विक्री करणाऱ्या 20 केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत तर किटकनाशके विक्री करणाऱ्या 11 केंद्राचे परवाने निलंबित तर 13 परवाने रद्द करण्यात आले आहेत. 


विक्रेत्यांनो कारवाई टाळायचीय, मग हे करा


शेतकऱ्यांना खते घेताना लिंकीक करु नये, शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे विक्री करावी. जादा दराने खतांसह बियाने, किटकनाशकांची विक्री करु नये. साठा रजिस्टर नियमित अद्यावत करावे, शेतकऱ्यांना पक्की बिले द्यावीत. विक्री केंद्राच्या प्रथमदर्शनी भाव फलक लावण्यात यावा. तसेच शेतकरी बांधवांनी खते, बियाणे, किटकनाशके परवानाधारक विक्रेत्यांकडूनच याची खरेदी करावी. बिलाची पक्की खरेदी पावती घ्यावी. शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या खते, बियाणे व किटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत काही संशय वाटल्यास त्यांनी पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन नाशिक विभागाचे तंत्र अधिकारी संजय शेवाळे यांनी केले आहे. 


इतर संबंधित बातम्या : 


मोठी बातमी : बोगस बियाणे, खते विकणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा