Nashik News : घरातील महिलांचे नाव शेतीच्या 7/12 उताऱ्यावर असल्यास लक्ष्मी योजनेचा (Lakshmi Scheme) लाभ महिला शेतकऱ्यांना घेता येणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, परंतू आमचा शेतकरी बांधव हे सर्व पचवून मार्गक्रमण करत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले आहे.


आज आत्मा प्रकल्पाच्या वतीने आयोजित नाशिक (Nashik) जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या (Krushi Mahotsav) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना पालकमंत्री भुसे (Dada Bhuse) म्हणाले, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव आयोजित करण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर त्याची सुरुवात नाशिक (Nashik) जिल्ह्याने सर्वप्रथम केली, हे कौतुकास्पद आहे. आज या महोत्सवात महिला शेतकऱ्यांनी आवर्जून सहभाग नोंदवला असून शेतीमध्ये कुटुंबातील महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांना कृषी योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे धोरण शासनाने अंगीकारले आहे. त्याचबरोबर घरातील महिलांचे नाव शेतीच्या 7/12 उताऱ्यावर असल्यास लक्ष्मी योजनेचा लाभ महिला शेतकऱ्यांना घेता येणार आहे, असेही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.


ते पुढे म्हणाले, सुमारे 65 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला असून, या योजनेत सहभागी होताना योजनेतील अटी व शर्ती काळजीपूर्वक पाहाव्यात. त्यासाठी हा अर्ज जाणीवपूर्वक मराठीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे. 72 तासांच्या आत साध्या कागदावर अर्ज केल्यास त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळते. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास अशा शेतकऱ्यांनाही मदत करण्याचा अत्यंत लाभदायक निर्णय शासनाने घेतला आहे. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान देण्याचाही निर्णय घेऊन शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही या सर्व निर्णयातून शासनाने दिली असल्याची भावना यावेळी पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त केली.


यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे बोलताना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कृषी पर्यटनासाठी जिल्ह्यातील वाव व संधींना अधोरेखित करताना सांगितले की, जिल्ह्यात विविध पिकांचे शेती उत्पादन घेण्यात येते. त्याचप्रमाणे कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना, कृषि तंत्रज्ञान, प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव यांच्या जोरावर उत्पादन वाढीत चांगली भरारी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कृषी पर्यटनाला मोठा वाव व संधी उपलब्ध होणार असल्याने त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावेत, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी केले.