Kisan Railway : मोठा गाजावाजा करून सुरू झालेली किसान रेल्वे (KIsan Railway) गेले चार महिने बंद आहे. चांगला प्रतिसाद लाभल्यामुळे ही रेल्वे आठवड्यातून चार वेळा सुरू झाली होती, पण कोळशाच्या कमतरतेमुळे (Coal Shortage) बंद करण्यात आलेली किसान रेल्वे अजूनही सुरू होऊ शकलेली नसल्याचे चित्र आहे. 


शेतकऱ्यांसाठी नाशिकहून (Nashik) ही रेल्वे सुरू करण्यात आली होती. किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत होता. मात्र सध्या किसान रेल्वे बंद असल्याने ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून लावून धरली जात आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी रेल्वे मंत्रालयाशी यासंदर्भात संपर्क साधला होता, मात्र अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. अनेकवेळा पाठपुरावा करून सुद्धा ही रेल्वे काही पुन्हा सुरू होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.


दरम्यान 08 ऑगस्ट 2020 रोजी पूर्ण देशभरामध्ये पहिली किसान रेल ही नाशिकच्या देवळाली स्टेशन (Deolali camp) वरून पाटणा येथे पोहचली. त्या माध्यमातून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 20 महिने ही सातत्याने पहिल्या टप्प्यामध्ये काही आठवड्यातून एकदा वाहतूक सुरू होती. त्यानंतर  शेतकऱ्यांकडून प्रतिसाद वाढत गेल्याने आठवड्यातुन दोनदा तीनदा आणि नंतर आठवड्यातून चारदा ही ट्रेन जात होती. त्यामध्ये रोज जवळ भुसावळ विभागातून 500 टन जात होता, म्हणजे जवळजवळ एका दिवशी रेल्वेला वीस लाख रुपये भाडे मिळत होते. त्यावरती जवळजवळ एक किलोला चार पैकी 50% सबसिडी मध्ये दोन रुपये 11 लाख रुपये रोज फूड प्रोसेसिंग मिनिस्टर रेल्वे मंत्रालयात देत होते. 


खासदार हेमंत गोडसे याबाबत म्हणाले की, गेले चार महिन्यापासून 13 एप्रिल 2022 पासून ही किसान रेल बंद झालेली आहे. रेल्वे मंत्रालयास याबाबत विचारले असता कोळशाचा तुटवडा होत असल्याने किसान रेल्वे बंद असल्याचे सांगण्यात येत आहे.   देशभरामध्ये राज्यभरामध्ये कोळशाच्या तुटवडा असल्या कारणाने विजेचे समस्या निर्माण झाली आहे. परंतु आता बराच काळ लोटला आहे आणि पुन्हा एकदा किसान रेल सुरू करावी अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली आहे. 


शेतकऱ्यांना थेट फायदा
किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इंडायरेक्ट मोबदला मिळत असे. मात्र आता शेतकऱ्यांना थेट मोबदला दिला जावा यास्तही धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत. सध्या किसान रेल्वेच्या माध्यमातून पहिल्यांदा व्यापाऱ्यांना मोबदला मिळत असे. त्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला मिळत असे. मात्र आता किसान रेल्वे सुरू झाल्यानंतर थेट शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल, याबाबत आग्रही असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. 


कोळशाचा तुटवडा
सध्या तर कोळशाची समस्या बऱ्यापैकी कमी झालेली आहे. म्हणून आता पुन्हा एकदा किसान रेल लवकरात लवकर सुरू करावी, अशा प्रकारची मागणी रेल्वे मंत्रालय असेल किंवा फूड प्रोसेसर मिनिस्ट्री असेल याच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत असल्याचे गोडसे यांनी सांगितले.