Aaditya Thackeray : तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakarey) यांनी काही महिन्यांपूर्वी उभारलेला शेंद्री पाडा येथील लोखंडी पूल (Shendripada) पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा लाकडी बल्ल्यांवरून पाण्याची हंडे घेऊन जाण्याची कसरत करावी लागत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. 


काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील (Nashik) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) इगतपुरी सुरगाणा परिसरात पाणीटंचाईंचे भीषण वास्तव समोर आले होते. त्र्यंबक तालुक्यातील शेंद्री पाडा येथील लाकड्या बल्ल्यावरून महिलांचा हंडे घेऊन जातानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ थेट तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचला होता. त्यांनी या व्हिडिओची दखल घेत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन लोखंडी पूल उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार येथे लोखंडी पूल देखील उभारण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी आदित्य ठाकरे हे स्वतः या पुलाच्या उद्घाटनासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पोहोचले होते. 


दरम्यान मागील 10 दिवसात नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबक तालुका, इगतपुरी तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आणि याच पुराच्या पाण्यात हा लोखंडी पूल वाहून गेला आहे. त्यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा जीवघेणी कसरत करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वीच एबीपी माझा ने घटनास्थळी जाऊन हा पुल पुराच्या पाण्यात पाण्याखाली गेल्याचे चित्र मांडले होते. त्यानंतर आज हा पुलच वाहून गेल्याने पुन्हा लाकडी बल्ल्यावरून प्रवास करावा लागत आहे. 


स्थानिकांनी दिले होते संकेत 
तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनाच्या माध्यमातून तास नदी काठावर लोखंडी पूल बसविण्यात आला होता. 30 फुटाहून अधिक उंचीवर पूल बसविण्यात आला होता. मात्र पावसाळ्यात पूल पाण्याखाली जाईल, पुलाचा उपयोग होणार नाही अशी माहिती स्थानिकांनी त्याचवेळी प्रशासनाला आणि युवासेना पदाधिकाऱ्यांना दिली होती. मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि आता पावसाळयात हा पूल चक्क वाहून गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या नशिबी जीवघेणी कसरत करणे आले आहे. 


आदित्य ठाकरे आज नाशकात 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडल्यानंतर राज्यात युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विशेष दौऱ्यास प्रारंभ केला आहे. शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आज आदित्य ठाकरे असून 22 जुलै रोजी सकाळी मनमाड येथे मेळावा घेतला जाणार आहे. मनमाड, येवला वैजापूर येथे सत्कार आयोजित करण्यात आला आहे.