Nashik Rain : राज्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळल आहे. एकीकडे शेती पिकांना भाव मिळत नाही, सरकार आश्वासनाच्या पलिकडे काही देत नाही. त्याच वेळी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) उभी पिकं झोडपली गेल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याचे चित्र नाशिक (Nashik) जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 
 
नाशिक जिल्ह्याच्या लाखलगावचे (Lakhalgaon) शेतकरी विजय मोडक मध्यरात्रीपासून जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसाने त्याचा काढणीला आलेल गव्हाचे (Wheat Crop) पीक पूर्णपणे झोपले गेले. सहा एकरमधील चार एकर पुढील आठ दिवसांनी बाजारात नेणार होते तर उरलेले दोन एकर गुढीपाडवा नंतर बाजारात येणार होता. एकरी साधारणपणे 35 ते 40 हजार खर्च त्यांना आला होता, त्यातून एकरी 60 ते 70 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र अस्मानी संकटामुळे उत्पादन खर्च ही भरून निघतो की नाही अशी स्थिती आहे. गहू झोडपला गेला असून उभं पीक अक्षरशः झोपले गेले आहे. आता आहे तो गहू वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. 


यावेळी शेतकरी विजय मोडक म्हणाले की, अवकाळी पावसामुळे गव्हाच्या पिकात दाण्यात आत कुज पडण्याची, दाणे काळे होण्याची भीती आहे. रोग पडतील, उत्पादन खर्चही भरून निघणार नाही. दरम्यान गव्हाबरोबरच आंबा, हरभरा, द्राक्ष (Grapes) या पिकांनाही फटका बसणार आहे. द्राक्ष मण्यांना तडे जाऊन रस गळती होणार आहे. पावसामुळे आंब्यांना आलेला मोहर गळून पडला असून आंबा उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हरभरा पीक तर उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. ही परिस्थिती केवळ नाशिक जिल्ह्यातील नाही तर पालघर, बुलढाणा जिल्ह्यातही अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वाडा, विक्रमगड, जव्हार आणि पालघरच्या काही भागात विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटसह आलेल्या पावसाने, बागायतदार शेतकरी वीट भट्टी व्यवसायिक यांच्यामध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. 


काजू, आंबासह रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. पालघर वीज पडून गवताच्या गंजीला भीषण आग लागली. या आगीत 1150 गवताच्या गठड्या जळून खाक झाल्यात. तर बुलढाणा जिल्ह्यात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने साखळी गावाजवळ वीज पडून अनेक मेंढ्या दगावल्याची घटना घडली आहे. आज होळीचा सण.. खर तर आज घरोघरी पुरणपोळी करून होळीच्या सणाचा गोडवा अधिक वाढवला जातो. मात्र ही पुरणपोळी ज्या गव्हापासून तयार केली जाते. त्या गव्हाचं पिक घेणारा बळीराजाच आज मोठ्या संकटात सापडला. त्यामुळे या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामा करावे आणि सरकार ने मदत देण्याची मागणी बळीराजाकडून केली जात आहे.