CM Eknath Shinde : दहा दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर अखेर एकनाथ शिंदेंचे बंडाला यश मिळाले असून शिंदे थेट मुख्यमंत्री पदी विराजमान होणार असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत घोषणा करीत राज्याच्या राजकारणात आणखी एक ट्विस्ट मिळाला. एकीकडे शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला असला तरी मात्र राज्यातील शिवसेना कार्यालयात पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. 


एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गुरुवारी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पेढे भरवले. त्यानंतर फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे असतील अशी घोषणा केली.


एकीकडे गेल्या दहा दिवांपासून सुरु असलेले बंडाचे राजकारण त्यात आज केलेला सत्ता स्थापनेचा दावा, सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा या सगळ्यामध्ये शिवसेना केंद्रस्थानी होती. म्हणजेच एकनाथ शिंदे हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. मात्र त्यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिवाय शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली. हीच अस्वस्थता देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेननंतर आणखीच वाढली. कारण देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी विराजमान होणार अशी घोषणा केली. यावरून शिवसेना व शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असायला हवे होते, मात्र राज्यभरात कुठेच काहीच दिसून येत नाही. शिवाय शिवसेना कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. 


विशेष म्हणजे दहा दिवसांपासून सुरु असलेलं बंड, हे भाजपशी हात मिळवणी करून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व एकणतः शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील. असे शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांनाच वाटत होते. मात्र राज्यभरातील जनतेला देवेंद्र यांच्या घोषणेनंतर आश्चर्याचा धक्का बसला. त्यातच दहा दिवसांपासून राज्यभरातील शिवसैनिक भरकटला होता. काल सायंकाळी देखील उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसैनिक अस्वस्थ झाले होते. मात्र आजच्या घोषणेनंतर शिवसैनिकांचा धक्काच बसला आहे. 


दोघेही शिवसैनिक 
एका शिवसेनेच्या नेत्याने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर दुसऱ्या शिवसैनिक मुख्यमंत्री पदी विराजमान होणार या बातमीने शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान झाल्याने आनंदच असायला हवा, मात्र दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच या सगळ्यांमध्ये नसल्याने शिवसैनिक तरी कसे सामील होणार अशी भावना सध्या शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळत आहे.