Nashik Neo Metro : जगात वेगाने विस्तारणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा (Nashik) समावेश होतो. नाशिक शहर आणि शहराला लागू असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), गोंदे एमआयडीसी, भगूर, सिन्नर, ओझर, दिंडोरी या परिसरातील शहरांना जोडणारी मेट्रो (Metro) किंवा रॅपिड रेल्वे केली जावी अशी मागणी आहे. त्र्यंबकेश्वर, गोंदे एमआयडीसी, भगूर, सिन्नर, ओझर, दिंडोरी या परिसरातील शहरांना जोडणारी मेट्रो किंवा रॅपिड रेल्वे केली जावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली.


महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन (Budget Session) सुरु असून शेवटचा आठवडा सुरू आहे. यात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहरात सुरु होत असलेल्या नाशिक निओ मेट्रो प्रकल्पाबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला. छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, जगात वेगाने विस्तारणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश होतो. मुंबईनंतर नागपुर (Nagpur) व पुणे येथे मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू होत आहेत. मात्र नाशिक शहरात मेट्रो रेल्वे सुरु करण्यासाठी शासनाकडून दिरंगाई केली जात आहे. खरं तर नाशिक शहर आणि शहराला लागू असलेल्या त्र्यंबकेश्वर, गोंदे एमआयडीसी, भगूर, सिन्नर, ओझर, दिंडोरी या परिसरातील शहरांना जोडणारी मेट्रो किंवा रॅपिड रेल्वे केली जावी अशी मागणी यापूर्वी केल्याचे भुजबळ म्हणाले. 


छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक शहराचा झपाट्याने होत असलेला विकास, परिसरातील भागाचे होत असलेले शहरीकरण आणि आगामी वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात दळणवळणाची साधने अपुरी पडणार आहे. त्यामुळे नाशिक शहरासाठी लवकरात लवकर मेट्रो, रॅपिड रेल प्रकल्पाचे काम सुरु होणे आवश्यक आहे. मात्र नाशिकरांच्या गळ्यामध्ये निओ मेट्रो मारली जात आहे अशी टीका त्यांनी केली. आता काम सुरु झाले तर आगामी तीन चार  वर्षात मेट्रो साकारली जावू शकते. मात्र याबाबत नाशिक या मेट्रोपॉलीटीन सिटीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. लुधियाना, चंदीगड, भोपाळ, जयपुर सारख्या शहरात मेट्रो प्रकल्प राबवण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. त्या तुलनेत नाशिकचा विस्तार अधिक आहे. तरी नाशिक शहरातली मेट्रो प्रकल्पास लवकरात लवकर मंजुरी मिळण्यासाठी राज्य शासनाकडे, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी भुजबळांनी केली.


नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती द्या


नाशिक- पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प रखडविला जात असल्याबाबत आहे. राज्य सरकारने या रेल्वे मार्गासाठी 20 टक्के वाटा उचलण्याला मंजुरी दिली आहे. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या भागीदारीतून महारेल या स्वतंत्र कंपनीची निर्मिती करण्यात आलेली आहे. दि. 10 फेब्रुवारी 2020 रोजी मध्य रेल्वेची तर माहे मार्च 2021 मध्ये राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे, त्यानंतर या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्ड आणि निती आयोगाकडे सादर करण्यात आला. या प्रकल्पाला 16 फेब्रुवारी 2022 रोजी रेल्वे बोर्डाची आणि दि. 7 एप्रिल 2022 रोजी निती आयोगाची मंजुरी मिळाली हे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर गेल्या 6 महिन्यांपासून हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र आता रेल्वे मंत्रालयाला अचानक हा प्रकल्प योग्य नसल्याचा साक्षात्कार झाला अशी टीका भुजबळ यांनी केली.