Nashik Crime : काही दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी (Nashik police) चौदा वर्षीय फरार संशयितास अटक केल्यानंतर आता नऊ वर्षांपूर्वी खून करून फरार झालेल्या एका संशयितास नाशिक (Nashik) पोलिसांच्या युनिट २ च्या गुन्हे शाखेने शिताफीने अटक करण्यात यश आले आहे. 


नाशिक शहरातील वडाळा गावात उत्तरप्रदेशातील (Uttarpradesh) ठेकेदार अब्दुल सलाम मुस्तफा चौधरी हा भाडेकरू म्हणून राहत होता. संबंधित अब्दुल चौधरीचा खून झाल्याची तक्रार स्थानिक रुम मालक असलेल्या रूबिना वसिम शेख यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हि घटना दि. 04 मार्च 2013 ला घडली होती. 


दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासा दरम्यान मयत अब्दुल सलाम मुस्तफा चौधरी (मुळ रा. उत्तर प्रदेश) हा वास्तव्यास होता. तो पीओपीचे कामाचा ठेका घेण्याचे काम करत होता. त्याच्याकडे एक अल्पवयीन व अल्लारक्षा मसल्ली शहा (फकिर), मंगरू उर्फ अब्दुल मन्नान चौधरी असे तीन कारागिर कामाला होते. अनेकदा मयत अब्दुल चौधरी हा तिघांकडून काम करून घेत असे, मात्र मोबदला देत नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे तिघांच्या मनात मयत अब्दुल चौधरी याच्याबद्दल राग होता. 


फेब्रुवारी 2013 मध्ये संशयित मंगरू यास मुलगी बघण्यासाठी मूळ गावी उत्तरप्रदेशात जायचे असल्याने याने सुट्टी मागितली. पंरतु अब्दूलने त्यास मजुरीची रक्कम न देता, काम जास्त असल्याचे कारण देत सुट्टी देण्याचे टाळले. त्यामुळे याचा राग मनात ठेवत (दि.1 मार्च 2013) रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान मयत अब्दुल चौधरी हा त्याच्या राहत्या खोलीत झोपेत असताना संशयित अल्लारक्षा मसल्ली शहा (फकिर) व मंगरू उर्फ अब्दुल मन्नान चौधरी व अल्पवयीन मुलगा यांनी त्यांच्या जवळील मफलरने अब्दुल चौधरी याचा गळा आवळून ठार केले. 


यावेळी तपासात अल्पवयीन मुलगा व अल्लारक्षा मसल्ली शहा (फकिर) यांना अटक करण्यात आली होती. पंरतु गुन्हयातील मुख्य सुत्रधार मंगरू उर्फ अब्दुल मन्नान चौधरी हा तेव्हा पासून फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. दरम्यान (दि.02ऑगस्ट) रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे  हवालदार चंद्रकात गवळी यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित मुंबईत असल्याचे समजले. वपोनी आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली  उपनिरीक्षक पोपट कारवाळ, हवालदार नंदू नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, अंमलदार राहुल पालखेडे यांचे पथक मुंबईला रवाना झाले. नवी मुंबई येथील रबाळे पोलीस ठाण्याच्या हददीत घनसोली परिसरातून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.