Girish Mahajan : सर्वाना समावेशक धरून मंत्री मंडळात (Maharashtra cabinet Expansion) खातेवाटप झाले असून येत्या काही दिवसांत खातेवाटपाचा दुसऱ्या टप्प्याचा विस्तार होणार असून यामध्ये निश्चितच महिलांना संधी दिली जाईल, कारण उशिरा धावणाऱ्या गाड्या वेळ भरून काढतात, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खातेवाटपावर दिली आहे. 


स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने (Ausgut 15) विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित भारतीय स्वातंत्र्याचा 75 व्या वर्धापनदिनाचे ध्वजारोहण गिरीष महाजन यांचे हस्ते संपन्न झाले. त्यावेळी मंत्री महाजन बोलत होते. यावेळी त्यांनी खातेवाटपाच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांना संधी दिली जाईल, याचा सर्वस्वी निर्णय भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) घेतील. त्यामुळे अजून खातेवाटप होणार आहे. सर्वांनाच यामध्ये सामावून घेतले जाणार आहे. त्यामुळे कोणीही नाराज नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यात अठरा आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये एकाही महिलेच्या समावेश अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनतर दोन तीन दिवसांपूर्वी खातेवाटप जाहीर झाले. यातही भाजपचा वरचष्मा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नाशिकचे आमदार दाद भुसे यांना कृषिमंत्री पद याबाबत खात्री होती, कृषीमंत्री थेट अब्दुल सत्तार यांना देण्यात आले. तसेच भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्या ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आदी जबाबदारी देण्यात आली. शिवाय त्यांनी नाशिकच्या विभागीय कार्यालयात ध्वजारोहण केले. यामुळे त्यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडणार हे निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. 


दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणांनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार, महिलांचा समावेश, खातेवाटपावरून नाराजी आदी प्रश्नांवर सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार लवकरच होईल, याबाबत पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील. शिवाय दुसऱ्या टप्प्यात महिलांचाही मंत्री मंडळात समावेश असेल. मात्र पक्षात महिलांची संख्या कमी आहे. परंतु महिलांना संधी देण्यात येईल असेही ते म्हणाले. 


दुसरा टप्पा लवकरच... 


तर दुसरीकडे खातेवाटपावरून शिंदे गटात नाराजी असल्याचे समोर येत आहे. या प्रश्नांवर ते म्हणाले, कि केसरकर याबाबत नाराज असल्याचे माध्यमांत दाखविले जात आहे. मात्र तसे काही नाही. आमच्या नवीन मंत्रिमंडळात कोणीही नाराज नाही. अजून मंत्री मंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा बाकी आहे. त्यावेळी सर्व बॅकलॉग भरून काढला जाईल, असे सूचक वक्तव्य यावेळी मंत्री गिरीश महाजण यांनी यावेळी केले. त्यामुळे लवकरच शिंदे सरकारचा मंत्री मंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल, तेव्हा महिलांचा समावेश होईल, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.