नाशिक जिल्ह्यातील किकवी पेयजल प्रकल्प, उर्ध्व गोदावरी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार ; मंत्री जयंत पाटील 


Minister Jayant Patil : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्प, कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी, आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजना लवकर मंजूर होण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेवून या कामांना तात्काळ मार्गी लावणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी पालकमंत्री छगन भुजबळ (Minsiter Chhagan Bhujbal) यांना बैठकीत दिली.   


     
नाशिक जिल्ह्यातील विविध पाणी प्रकल्पांविषयी मंत्रालयातील दालनात नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेल्या विविध प्रकल्प मंजुरीची बैठक पार पडली. या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील बोलत होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, उर्ध्व गोदावरी प्रकल्प प्रस्ताव, कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी, आंबोली, वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजनांच्या कामांच्या बाबतीत राज्य तांत्रिक सल्लागार समिती, नियोजन विभाग अशा वेगवेगळया पातळीवर प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून ही कामे मंजूर करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून एक उच्चस्तरीय बैठक घेऊन त्या त्या यंत्रणांकडून ही कामे मंजूर होण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. जेणेकरून नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागातंर्गत असलेले प्रकल्प मार्गी लागतील असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.


पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले..... 
नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यास नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्वं गोदावरी प्रकल्पा अंतर्गतची दिंडोरी तालुक्यातील धोंडाळपाडा, ननाशी, मांजरपाडा (देवसाने), गोळशी महाजे यासह इतर प्रवाही वळण योजना, तसेच पुणेगाव दरसवाडी आणि दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण आणि ओझरखेड डावा कालव्याची अपूर्णं कामे मार्गी लागतील. कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी या प्रवाही योजनांना प्रशासकीय मान्यता तर नाशिक शहराच्या भविष्यातील पाण्यासाठी किकवी पेयजल प्रकल्पालाही सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे अत्यंत आवश्यक आहे.


त्याचबरोबर पार गोदावरी उपसा जोड योजनेमुळे पूर्वेकडे वाहून जाणारे पाणी पश्चिमेकडे गोदावरी खोऱ्यात आणले जाणार आहे.या योजनेत धरणे एकमेकांशी नैसर्गिक उताराने बोगदा व बंद नलीकांद्वारे जोडून मध्यवर्ती धरणाच्या पाणीसाठ्यातून पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन आहे. सर्व धरणे एकमेकांस समान संचय पातळीत जोडण्यात येणार असल्यामुळे या सर्व साठ्यांचे एकात्मिक जलनियोजन त्यामुळे शक्य होणार आहे. गोदावरी खो-यातील पाण्याची तुट भरून काढण्यासाठी पार -गोदावरी उपसा जोड योजना क्रमांक 3 व 4 मंजूर करावे अशी मागणी जलसंपदा मंत्री यांच्याकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.