Nashik Rain : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या नाशिकरांना (Nashik) शुक्रवारी पावसाने दिलासा दिला. पहाटेपासून सुरु असलेल्या पावसामुळे चागंळीच दाणादाण उडाली. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्याच पावसात गोदामाईत (Godavari) गटार मिश्रित आले असून यामुळे पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.  


गेल्या काही दिवसांपासून पावसाने नाशिक शहरावर आभाळमाया कमी केली होती. त्यामुळे सर्वसामान्य नाशिककर चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होता. अखेर आज सकाळापासूननाशिक शहरात पावसाची संततधार सुरु असून आजच्या पावसाने येत्या काही दिवसात दमदार पाऊस होण्याचे संकेत दिले आहेत. असे होत असलेल्या पावसाने नागरिकांसह लहान-मोठय़ाची तारांबळ उडवली. पहिल्याच पावसात गोदामाईला खळाळून पाणी वाहू लागले आहे. मात्र हे पाणी दूषित असून यामध्ये गटारीचे साहित्यही वाहत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पुन्हा एकदा पहिल्याच पावसात गोदामाइला गटारीचे स्वरूप आले. 


काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात शहरातील सराफ बाजार, दहीपूल फूल बाजार जलमय व चिखलमय झाला होता. त्याचबरोबर वाहने व दुकानांचे नुकसान झाले होते. तसेच या भागात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत केलेल्या कामामुळे पाणी साचणार नसल्याचा दावा केला जात होता. मात्र आजही अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीचे काम अद्यापही सुरु आहे. यामुळे अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पावसाळा सुरु झाला असला तरी स्मार्ट कामे सुरु असल्याने ठिकठिकाणी गाळाचे, चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. तयामुळे स्मार्ट सिटीचा स्मार्ट पण पुन्हा एकदा फोल ठरला आहे. 


जिल्ह्यात चार ते पाच तालुके वगळता इतरत्र पावसाचे आगमन झाले नव्हते. ज्या भागात त्याने हजेरी लावली, तेथूनही तो गायब झाला होता. जलसाठा खालावत असल्याने टंचाईचे संकट गडद होत आहे. पावसाअभावी पेरणी लांबणीवर पडण्याची धास्ती व्यक्त केली जात असताना जूनच्या उत्तरार्धात शहरासह अनेक भागांत त्याने हजेरी लावली. सामान्यांसह विक्रेत्यांची तारांबळ उडाली. सराफ बाजार, दहीपूल, फुल बाजार, शुक्ल गल्ली परिसर जलमय झाला. तर गोदामे वाहू लागली आहे, मात्र यात गटारीचे पाणी मिश्रित असल्याचे नागरिकांनी सांगितले. शिवाय पानवेली, गटारीतले साहित्य या पाण्याबरोबर वाहून आल्याचे दिसून आले. 


दरवर्षीं व्यावसायिकांचा रोष 
दरवर्षीं पावसाळय़ात सराफ बाजार, दहीपूल परिसरात दरवर्षी पाणी शिरते. त्यावर तोडगा म्हणून स्मार्ट सिटीअंतर्गत पावसाचे पाणी पात्रात वाहून जाण्यासाठी विशेष योजना राबविली गेली. परंतु, तिचा कुठलाही उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. गटारी व नाल्यांची साफसफाई न झाल्याची परिणती पहिल्याच पावसात परिसर जलमय होण्यात झाल्याचा आरोप येथील व्यावसायिकांनी केला आहे.