Nashik News : केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर राज्य शासनाने औरंगाबाद (Aurangabad) शहराचे छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) असे नामकरण केले आणि अनेक ठिकाणी या नावाचा वापर सुरू झाला. मात्र, नाशिक शहरातील रस्त्यांवर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांवर अद्यापही 'औरंगाबाद' असा उल्लेख असल्याने नाशिक शहरात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर कधी होणार? असा प्रश्न केला जात आहे.


दरम्यान दोन महिन्यापूर्वी शासनाने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे केले. लगोलग महापालिकेने तसा बदल केला, अनेक ठिकाणच्या एसटी महामंडळाने (ST Mahamandal) बसस्थानकावरील फलक बदलले, तर बसेस- वरील पाट्या बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. इतर शासकीय कार्यालयांकडूनही अभिलेख्यांमध्ये शहराचे नवीन नाव वापरण्यास सुरुवात झाली आहे. परंतु नाशिकमध्ये (Nashik) अद्यापही शहरातील जे महत्वाचे दिशा फलक आहेत, ते अद्यापही जैसे थे आहेत. त्यामध्ये मात्र अजूनही हा बदल झालेला नाही. 


औरंगाबाद शहराचे नामांतर होऊन 'छत्रपती संभाजीनगर' असे नाव देण्यात आले. याला दीड ते दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरीही नाशिक शहरातील नवीन आडगाव नाका परिसर, तपोवन परिसर, स्वामी नारायण पोलिस चौकी, नीलगिरी बाग परिसर, मिरची चौक चौफुली, जनार्दन स्वामी आश्रम या रस्त्यांवर नाशिक महानगरपालिकेतर्फे लावण्यात आलेल्या दिशा फलकांतील नावात बदल झाल्याचे दिसून येत नाही. 
 
दरम्यान त्यामुळे शासकीय यंत्रणात जागरूक झाली नसेल तर नागरिक तरी कसे संभाजीनगर म्हणणार असा प्रश्न केला जात आहे. नवीन आडगाव नाका, मिरची सिग्नल चौक, तपोवन, नांदूर नाका, निलगिरी बाग परिसर या भागात अजूनही जुनेच फलक दिसून येत आहेत. फक्त मिरची हॉटेल चौफुलीवरील औरंगाबाद नावाचा फलक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर रोड असा दिशा फलक लावण्यात आला आहे 


फक्त औरंगाबाद नाक्यावरचा फलक बदलला.. 


औरंगाबाद शहराचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यात आल्यानंतर आता खऱ्या अर्थानं सगळीकडे छत्रपती संभाजी नगर होताना दिसून येत आहे. याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगर पालिकेपासून ते आता नाशिकच्या रोडपर्यंत नाव बदलण्यास सुरुवात झाली आहे. शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी मात्र अनेक ठिकाणी इतर जिल्ह्यांत रोड आणि चौकांना औरंगाबाद नावाचे फलक लावलेले दिसून येत आहे. नाशिकमध्ये देखील ‘औरंगाबाद रोड’ नावाचे फलक आहे. फक्त काही दिवसांपूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखला जाणाऱ्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून छत्रपती संभाजी नगर असे फलक लावण्यात आले आहे.