Nashik Samrudhhi Highway : समृद्धी महामार्गचे (Samrudhhi Highway) पॅकेज-14 एकापेक्षा जास्त कारणांसाठी खास असणार आहे. देशातील सर्वात रुंद आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदे (Road tunnels) अशी ओळख असणार असून, वाहन चालकांना ब्रिजवर वाहन चालवताना सह्याद्री पर्वतरांगांचे चित्तथरारक रूप अनुभवयास मिळणार आहे. हे दोन्ही पूल सह्याद्री पर्वत रांगांमधील घनदाट असलेल्या जंगलाच्या परिसरात बांधले गेले आहे. जवळपास 2019 च्या सुरुवातीला या बोगद्याच्या कामाला सुरवात केल्यानंतर दोन वर्षांच्या विक्रमी वेळेत वर्ष 2021 मध्ये पूर्ण झाले असून तर ब्रिज-II चे काम पूर्ण होत वेळेवर पूर्ण झाला आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्ग चर्चेत आलेला आहे. नागपूर ते मुंबई (Nagpur To Mumbai) असा महामार्ग बनविला जात असून सद्यस्थितीत पहिल्या टप्प्याचे उदघाटन करण्यात आल्यानंतर या मार्गावर अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या. त्यावरून सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्याचे काम देखील सुरु असून सह्याद्री पर्वतरांगांमधून जाणाऱ्या नाशिकमधील (Nashik) पिंपरी सदो आणि ठाण्यातील वाशाळा बुद्रुकला जोडणारे 13.1 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. सध्या फक्त बोगद्याच्या आतील भागात किरकोळ काम सुरु आहे. 1.2 किमी लांबीचा ब्रिज-II हा बोगद्यांनंतरचा दुसरा सर्वात आव्हानात्मक भाग होता. तो वनक्षेत्रात असल्यामुळे तिथे जाण्यासाठी आम्हाला रस्ते बांधावे लागले, असे अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक शेखर दास यांनी सांगितले.


शेखर दास (Shekhar Das) पुढे म्हणाले कि, ब्रिज-II च्या स्थानापर्यंत साहित्याची वाहतूक करणे हे एक मोठे आव्हान होते.  प्रथम, जड वाहनांच्या वाहतुकीकरता नवीन पाइप कल्व्हर्ट ब्रिज बांधण्यासाठी आणि नागमोडी वळणे रुंद करण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांकडून परवानग्या घेऊन रस्ते बांधले. त्याशिवाय पावसाळ्यात काम करणे आणि त्या भागात राहण्यासाठी छावणी उभारणे हे ही आव्हानात्मक काम होते. शिवाय इगतपुरी (Igatpuri) तालुका हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानाच्या क्षेत्रात येतो. त्यामुळे सुरवातीला काही वर्षे आम्हाला मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. ज्यामुळे आमच्या बोगद्याच्या बांधकामावर परिणाम झाला. तसेच ब्रिज-II च्या कामात अडथळा निर्माण झाला. घनदाट जंगल क्षेत्र, जाण्यासाठी रस्त्यांचा अभाव, डोंगराळ प्रदेश आणि जास्त पाऊस यामुळे आम्हाला अत्यंत सावधगिरीने पावले टाकावी लागली. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे दृश्यमानतेचा प्रश्न निर्माण होत होता. मात्र, आम्ही सर्वोत्तम सुरक्षा पद्धती वापरून तिथे काम केल्याचे ते म्हणाले.


त्याचबरोबर सदर पुलाचे बांधकाम करताना आणखी एक मोठे आव्हान आमच्यासमोर असल्याचे दास म्हणाले. ते म्हणजे उंचीचे. त्यामुळे 'बॅलन्स्ड कॅन्टिलिव्हर कास्ट इन-सिटू ब्रिज' या पद्धतीत हा पूल बांधण्यात आलेला आहे आणि त्याची लांबी 1.2 किमी आहे. त्यात एकूण 35 पिअर्स (piers) आहेत. त्यापैकी सर्वात उंच हा 60 मीटरचा आहे.  त्यामुळे जोरदार वारा आणि मुसळधार पावसाचा सामना करत सह्याद्रीच्या खोऱ्यात 60 मीटर उंचीवर काम करणे सोपे नव्हते. मात्र, काम पूर्ण करण्यासाठी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. प्रकल्प पूर्ण करण्यात आणि किरकोळ कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे दास दास म्हणाले.


13 किमी लांबीचा दुसरा टप्पा पूर्णत्वास 


महाराष्ट्र समृद्धी महामार्गच्या पॅकेज-14 मध्ये 7.78 किमी लांबीचे दोन बोगदे, दोन ब्रिज, एक इंटरचेंज, एक टोल प्लाझा आणि इतर बाबीचा समावेश आहे. हे पॅकेज 13.1 किमी लांबीचे असून ते नाशिकच्या इगतपूरी येथील पिंपरी सदोशी ठाण्यातील वशाळा बुद्रुकशी जोडेल. ते कार्यान्वित झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. याआधी अफकॉन्सने वर्धा येथील महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पॅकेज-2 चे काम वेळेआधी पूर्ण केले होते. मागील वर्षी समृद्धी कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता याच भागातील दुसरा टप्पा देखील जवळपास पूर्ण झाला आहे. 


पॅकेज-14 ची ठळक वैशिष्ट्ये 


एकूण लांबी: 13.1 किमी, महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि भारतातील सर्वात रुंद रस्ता बोगद्यांचा समावेश आहे. बोगद्याची लांबी : 8 किमी;  बोगद्याची रुंदी: 17.6 मीटर असून बोगदा 2 वर्षांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाला. आधुनिक अग्निशमन आणि सुरक्षा यंत्रणांनी सुसज्ज असे बोगदे आहेत. अग्निसुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा वापरण्यात आली आहे. या 13 किलोमीटरच्या रस्त्यात 2 ब्रिज, 1 इंटरचेंज असणार आहे.