Nashik Udhhav Thackeray : आज उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) हे नाशिकमध्ये (Nashik) असून मालेगाव शहरातील एमएसजे महाविद्यालयात जाहीर सभा होत आहे. मात्र आजच्या सभेसाठी मालेगाव शहरच का निवडले, हे महत्वाचे आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नाशिकसह उत्तर महाराष्ट्र्रात ठाकरे गटाचा जम बसविणे महत्वाचे आहे. शिवाय नाशिक, धुळे, नंदुरबार पट्ट्यात ठाकरे गटाचा एकही आमदार नाही, त्यामुळे आजची सभा मालेगावमध्ये होत असल्याचे दिसून येत आहे. 


गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मालेगावची (Malegaon) सभा आज होत असून आज सायंकाळी मालेगाव शहरातील एमएसजे महाविद्यालयाच्या प्रांगणात ही सभा होत आहे. या सभेच्या तयारीसाठी संजय राऊत (Sanjay Raut) हे दोन दिवसांपासून नाशिकसह मालेगावमध्ये पाहणी करत आहेत. दुसरीकडे काही वेळातच उद्धव ठाकरे हे नाशिकला पोहचण्यासाठी शक्यता आहे. असे असताना उद्धव ठाकरे यांनी सभेसाठी मालेगावच का निवडले? याबाबत चर्चा आहे. यावर संजय राऊत म्हणाले कि, मालेगांव शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला आहे. म्हणून मालेगांवला सभा घेत आहे. इकडचे लोक पार्श्वभागाला पाय लावून पळाले, म्हणून जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. अद्वय हिरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मालेगावला नवी संजीवनी मिळाली असल्याचे राऊत यांनी म्हटले.


एकूणच मालेगाव शहरात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. मालेगाव शहराचा विचार केला तर नाशिक, धुळे, नंदुरबार पट्ट्यात ठाकरे गटाचा एकही आमदार नाही. शिवाय दादा भुसे (Dada Bhuse), सुहास कांदे, गुलाबराव पाटील हे खान्देशातले महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदेंसोबत गेल्याने ठाकरे गटाला या भागात महत्वाचा नेता नसल्याने आता अद्वय हिरे या नवा चेहरा मिळाला आहे. त्यामुळे मालेगावसह उत्तर महाराष्ट्रातात ठाकरे गटाला जम बसवण्यासाठी नवं नेतृत्व तयार करणं गरजेचं आहे. जेणेकरून या भागात ठाकरे गटाला एक चांगला नेत्तृत्व मिळून उभारी मिळण्यास मदत होईल. तसेच मुंबई, मराठवाड्यात ठाकरे गटाचा उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेनं अधिक प्रभाव आहे. सत्तांतरावेळी अनेक महत्वाचे नेते शिवसेना शिंदे गटात गेल्याने नाशिक शिवसेना ठाकरे गट काहीसा कमकुवत झाल्याचे चित्र आहे. 


 उत्तर महाराष्ट्रात पीछेहाट परवडणार नाही....


लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी अवघे काही महिने शिल्लक असून सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपने देखील महाविकास आघाडीला धूळ चारण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला राज्यात जम बसविण्यासाठी त्या त्या भागात नवे नेतृत्व तयार करणे महत्वाचे ठरणार आहे. 2024 मध्ये शिंदे-भाजप युतीला टक्कर देताना उत्तर महाराष्ट्रात पीछेहाट परवडणार नाही. त्यामुळे नाशिकच्या मालेगावमधून तयारी करण्यात येत आहे. शिवाय मालेगावमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीय असल्याने ही सभा महत्वपूर्ण ठरणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मालेगाव शहरात उर्दू बॅनर लावण्यात आल्याचे दिसून आले. एकूणच मुस्लिम मतांकडेही ठाकरे गटाचं लक्ष असून आजच्या सभेचा प्रचार देखील उर्दू भाषेत केल्याचे पाहायला मिळाले.