Eknath Shindeमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. जे घरी बसून काम करतात, त्यांना जनता घरीच बसवते, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना हल्लाबोल केला आहे. 'लोकांच्या दारोदारी सरकार फिरतंय, अशी टीका काही विरोधक करू लागलेल आहेत. खरं म्हणजे घरी जे बसतात, घरातून काम करतात. त्याच्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलेले आहे. घरी बसलेल्यांना जनता घरी बसवून टाकते आणि लोकांमधील कार्यकर्त्यांना लोकांमध्ये येण्याची संधी देते', असं टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर सोडले आहे. 


'घरी जे बसून काम करतात, त्यांना जनता घरीच बसवते'


नाशिकमध्ये (Nashik) 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकांच्या दारोदारी सरकार फिरतंय अशी टीका काही विरोधक करू लागलेल आहेत. पण, दारोदारी फिरवून सामान्य माणसांची काम करण्यासाठी आपलं जनतेचं सरकार स्थापन झालेलं आहे. घरी बसून राहण्यासाठी सत्ता नसते, ही सत्ता लोकांच्या दारात घराघरात जाऊन योजना राबवण्यासाठी असते, लोकांपर्यंत जाण्यासाठी सत्ता असते. शासन आपल्या दारी लोकाभिमुख कार्यक्रम असून एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना घेता येत आहे. तसेच काही लोकांनी घरी बसून कामे केली. त्यामुळे घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवेल, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला लगावला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका 


पुढे ते म्हणाले की, 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम क्रांतिकारी असून या माध्यमातून आम्ही लोकांच्या हिताची कामे करत आहेत. तसेच पंतप्रधान मोदींचे नेतृत्व स्वीकारून अजित पवार आमच्यासोबत आले असून राज्याच्या विकासाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. अडीच वर्षात अनेक विकासकामे थांबली होती. पण, आमच्या सरकारने सर्व स्पीड ब्रेकर काढून ती सर्व कामे पुन्हा सुरु केली, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आम्ही तीन जण एकत्र आलो असून आम्ही समजूतदार आहोत. तसेच देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचे असून ते निष्कलंकित माणूस आहेत. विरोधकांची वज्रमूठ सभा ही वज्रझूठ सभा ठरली आहे. त्यांनी जेवढे आरोप केले तेवढ्या त्यांच्या जागा कमी झाल्या, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी म्हटलं आहे.


अजित दादा सहकाऱ्यांचे स्वागत 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित दादा आणि त्यांचे सहकाऱ्यांचे युती सरकारमध्ये मनापासून स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, आता सरकार शिवसेना भाजपा युतीचे सरकार हे ताकदीने वेगाने निर्णय घेत होतो. यामध्ये अजित दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भर पडलेली आहे. त्यामुळे अधिक वेगवान सरकार होईल, अधिक वेगाने निर्णय घेईल. मागील अडीच वर्षात सर्व काम ठप्प होती. सर्व प्रकल्प बंद होते. मुंबईचा मेट्रो असेल, समृद्धी महामार्ग असेल, अनेक जे प्रकल्प थांबले होते. थांबवले गेले होते. परंतु देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा देखील अनेक प्रकल्प सुरू केल्यानंतर सारखे जलयुक्त शिवारसारखे शेतकऱ्यांच्या फायद्याचे प्रकल्प बंद झाले. पण युतीचं सरकार आल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर धडाधड काढून टाकत प्रकल्पांना चालना देण्याचे काम सरकारने केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 


पोटदुखीवर रामबाण उपाय : फडणवीस


या कार्यक्रमात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. फडणवीस म्हणाले की, 'नाशिकमध्ये शासन रामदरबारी आले आहे. जे राज्य काम करते ते रामराज्य असते. त्यामुळे हा शासकीय योजनांचा कुंभमेळाच आहे, ज्याच्यामुळे आपण सगळे एकत्र आला आहात. कुंभमेळ्याच्या या सेवा तीर्थावर आपली सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. पण कधी कधी चांगलं काम केलं तरी लोकांच्या पोटात दुखतं. लोकांना लाभ दिला तरी लोकांच्या पोटात दुखत. पण आता चिंता करू नका, आता कोणाच्याही पोटात दुखलं तर त्या पोट दुखीवर औषध देण्याकरता डॉ. एकनाथ शिंदे आणले आहेत', अशी मिश्किल टिपण्णी फडणवीस यांनी केली. 


संबंधित इतर बातम्या :


Devendra Fadnavis : 'पोटदुखीवर रामबाण उपाय म्हणजे डॉ. एकनाथ शिंदे', देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला