मुंबई : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांच्या संसदीय व सामाजिक कार्याचा गौरव आज विधानसभेत करण्यात आला आहे.


केशवरावजी शंकरराव धोंडगे यांचा जन्म 25 जुलै 1922 रोजी मन्याड व पार्वती नदीच्या खोऱ्यात वसलेल्या कंधार तालुक्यातील गऊळ या गावी झाला. त्यांचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले. त्यांनी 1948 मध्ये श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून ज्ञानदानाचे कार्य केले. औरंगाबाद, नांदेड, कंधारमधील वाडी तांड्यावरच्या मुलामुलींना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली. दरम्यान नांदेड जिल्ह्यात 12  प्राथमिक शाळा, 11 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, दोन वरिष्ठ महाविद्यालये व एक विधी महाविद्यालय सुरु केले. त्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय सहभाग घेतला,तर आणीबाणीच्या काळात कारावासही भोगला आहे.


 जनतेच्या न्याय हक्कासाठी  धोंडगे यांनी अनेक आंदोलने केली. त्यांनी 'वंदे मातरम्' गीताने दोन्ही सभागृहांच्या सत्राचा प्रारंभ व्हावा, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार डिसेंबर1990 पासून दोन्ही सभागृहांच्या सत्रांचा प्रारंभ 'वंदे मातरम' गीताने होऊ लागला आहे. मराठवाडा विकासासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करणे, लोहा तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण असावे यासाठीही विशेष प्रयत्न केले.


नांदेड जिल्ह्यात एसटी डेपोची मागणी, विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात महात्मा फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य शासनाच्यावतीने प्रकाशित करणे अशा अनेक मागण्या त्यांनी शासन दरबारी मंजूर करुन घेतल्या. विविध संसदीय आयुधाचा वापर करून समाजपयोगी कामे कशी तडीस न्यावीत हे  धोंडगे यांनी दाखवून दिले आहे.  धोंडगे जसे राजकारणी व समाजकारणी आहेत तसे ते पत्रकार व साहित्यिकही आहेत.


नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्याच्या सीमेवर त्यांनी गुराखी गडाची निर्मिती केली आहे. सन 1991 पासून याठिकाणी, दरवर्षी जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरविले जाते. श धोंडगे यांनी विपुल लेखन केले आहे. 'जय क्रांती या साप्ताहिकाचे ते संपादक राहिले आहेत. त्यांनी आजतागायत सुमारे 30 पुस्तकाचे लेखन केले आहे.


'दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कार', 'धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार', 'मराठवाडा रत्न पुरस्कार', 'भारतीय विकास रत्न अँवार्ड अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 'श्री शिवाजी लोक विद्यापीठ, कल्याण यांनी त्यांना मानद डि. लीट. पदवी प्रदान करुन सन्मानित केले आहे.