Nanded Local News Updates:  नांदेड जिल्ह्यातील तामसा येथील बारालिंग देवस्थानाच्या वतीने भाजी भाकरी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मकरसंक्रांतीनंतर करी निमित्त बारा प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्यांचा महाप्रसाद बारालिंगाला अर्पण करण्याची दोनशे वर्षाची परंपरा आहे. या महाप्रसादाच्या पूर्व तयारीसाठी जिल्हा प्रशासनही आवर्जून आपला सहभाग नोंदवले. आज ह्या महाप्रसादाच्या भाजी महाप्रसादाच्या वेळी हदगाव येथील तहसीलदार जीवराज डापकार यांनीही भाजीपाला कापून या महाप्रसाद कार्यक्रमास आपला हातभार लावलाय. बारालिंग महादेवास बारा मिसळ्याच्या भाजीचा नैवेद्य मकरसंक्रांतीनंतर करीच्या दिवशी देण्याची ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. करी निमित्त भरल्या जाणाऱ्या या महाप्रसाद यात्रेत पंचक्रोशीतील नागरिकांसह, तेलंगणा,आंध्रप्रदेश राज्यातील हजारो भाविक हजेरी लावतात. प्रसादाच्या रुपात वांगे, बटाटा, मुळा, काकडी, टमाटे, पालक, मेथी,गोबी, गवार, शेवगा, दोडके, चुका या विविध बारा भाज्यांसह जंगली वनऔषधी टाकून ही भाजी तयार केली जाते. तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक महाप्रसादासाठी या ठिकाणी भाकरी देतात. यावर्षी जवळपास 50 क्विंटल भाकरी व 250 क्विंटल भाजीचा महाप्रसाद यावेळी करण्यात आला होता. तर काही नागरिक स्वतः घरून आणलेल्या भाकरी व बारा मिसळ्याची भाजी प्रसाद म्हणून ग्रहण करतात. 


दरम्यान बटाटा, गोबी, वांगे, मेथी, मुळा, काकडी, भेंडी, गवार, टमाटे, शेवगा, भोपळा, दोडके, कददू आदी बारा प्रकारच्या भाज्या व वनौषधी टाकून कोणताही मसाला न वापरता  तब्बल 250 क्विंटल वजनाची महाकाय महाप्रसाद यावेळी तयार केला जातो. सदर बारा मिसळ्यांचा हा महाप्रसाद ग्रहण केल्यास रोगराई होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.


हदगाव तालुक्यातील तामसा येथील बारालिंग देवस्थानातील भाजी- भाकरीची यात्रा मराठवाड्यातच नाही तर विदर्भ, कर्नाटक, तेलंगणातही प्रसिद्ध आहे. या यात्रेला 179 वर्षांची परंपरा आहे. मकर संक्रातीच्या करीला (दुसऱ्या दिवशी) यात्रेच्या निमित्ताने एक लाखांहून अधिक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. येथील महत्त्व पाहून तीर्थक्षेत्राला शासनाने पर्यटनस्थळाचा क दर्जा दिला आहे. तामसा गावापासून नैऋत्येला 2 कि. मी. अंतरावर बारालिंग महादेवाचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरात पाच फूट भुयारात काळ्या पाषाणात कोरलेले शिवलिंग आहे. बाहेर गाभाऱ्यात महादेवाची बारा पिंड पाषाणात कोरलेली आहेत. त्यासमोरच नंदी आहे. मंदिराचे खांब पाषाणाचेच असून, त्यावर कोरीव काम आहे. या मंदिराच्या पूर्वेलाच गौतम 'मंदिर आहे. गौतम ऋषींचे तेथे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. या मंदिराचे पुजारी महादलिंग महाराज कंठाळे यांच्या पूर्वजांनी भाजी-भाकरीची परंपरा सुरू केली. त्यावेळी रानातील झाडांची पाने, फळे, केळी, कंदमुळे गोळा करून भाजी बनविण्यात येत असते. त्यासाठी 15 दिवस अगोदरपासून तयारी केली जाते. यात्रेची परंपरा पाहून शासनाने देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा 'क' दर्जा दिला आहे.