Nanded News : महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्यासाठी जुळवाजुळव करणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) नांदेड (Nanded) जिल्ह्याकडे अधिक लक्ष दिलं आहे. अन्य पक्षातील नाराज नेत्यांना आपल्या पक्षात ओढण्यासाठी बीआरएसने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेससह अन्य पक्षातील अनेक नेते हळूहळू त्यांच्या गळाला लागत आहेत. अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही काहीसे लांब असणारे शेतकरी नेते आणि माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे (Shankaranna Dhondge) यांचंही नाव आता समोर आलं आहे. ते बीआरएसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येतं. दोन दिवसांपूर्वी त्यांनी तेलंगणा इथे जाऊन या पक्षाच्या नेत्यांशी प्राथमिक स्वरुपाची चर्चा केल्याची माहिती आहे. यावेळी त्यांच्यासोबत दत्ता पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते असं समजतं.


भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगणात स्वबळावर आपलं साम्राज्य निर्माण केलं आहे. यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. यासाठी सर्वप्रथम त्यांनी आपला मोचां महाराष्ट्राकडे वळवला आहे. नांदेड इथे केसीआर यांची नुकतीच जंगी सभा झाली. या सभेच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन घडवून आणलं. त्याचवेळी त्यांचे इरादे स्पष्ट झाले होते. पण, केसीआर यांच्यासाठी हा राजकीय मार्ग खडतर असला तरी लढवय्ये आणि शेतकरी नेते म्हणून ओळखले जाणारे केसीआर आणि त्यांचे मंत्री तसेच आमदार हे नांदेड जिल्ह्यातील विविध पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. बीआरएस हा शेतकरी आणि गोरगरिबांचा पक्ष असल्याचे पटवून देत आहेत. यात त्यांना बऱ्यापैकी यश देखील आल्याचं मानलं जातं.


निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बीआरएसची आतापासूनच तयारी


महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील अनेक गावं नांदेड जिल्ह्यालगत आहेत. दैनंदिन व्यवहारापासून ते रोटी-बेटी व्यवहारापर्यंत महाराष्ट्र आणि तेलंगणातील विशेषतः नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क आहे. तेलंगणात सत्ताधारी टीआरएस पक्षाच्या वेगवेगळ्या योजनांमुळे तिथल्या जनतेला कसा फायदा झाला आहे, हे माहित असलेल्या सीमावर्ती भागातील लोकांवरही केसीआर यांच्या कार्यपद्धतीचा प्रभाव आहे. त्यांच्या कामामुळे त्यांनी सीमावर्ती भागात राहणाऱ्या जनतेवर चांगलीच भूरळ पाडली आहे. याचा फायदा मतामध्ये रुपांतरीत करण्यासाठी नुकतीच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेल्या बीआरएस पक्षाला कसा फायदा होईल या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर डोळा ठेवून बीआरएसने काम सुरु केलं आहे. विधानसभा निवडणुकीत या पक्षाला किती यश मिळेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. परंतु, त्या दृष्टीने बीआरएसने आतापासूनच तयारी सुरु केली आहे.


पक्षातील गटबाजीमुळे शंकरअण्णा धोंडगे अलिप्त


शेतकऱ्यांचे नेते म्हणून ज्यांची ओळख गेल्या अनेक वर्षापासून नांदेड तसेच मराठवाड्यातील जनतेला झाली आहे, अशा शंकरअण्णा धोंडगे यांच्या संपर्कात बीआरएसचे नेते आहेत. घोंडगे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असले तरी अलिकडच्या काळात ते पक्षात राहूनही काहीसे अंतर ठेवून आहेत. राष्ट्रवादीच्या तिकीटावरच ते याआधी लोहा-कंधार मतदारसंघातून निवडून देखील आले आहेत. राष्ट्रवादी किसान भारती या आघाडीचे ते काही काळ प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. राष्ट्रवादीत येण्याआधी शंकरअण्णा यांनी शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेत अनेक वर्षे काम केलं आहे. शेतकरी संघटनेच्या अनेक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. कापूस आंदोलनात तर त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. संघटनेत काम करताना चळवळ म्हणून काम केलेल्या या कार्यकर्त्यांला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर आमदार होण्याची संधी मिळाली. परंतु, आता ते पक्षातल्याच गटबाजीमुळे काहीसे दूर फेकले गेले आहेत. त्यांचे राजकीय विरोधक असलेले हरिहरराव भोसीकर यांना पक्षाने जिल्हाध्यक्ष पदावर बसवून शंकरअण्णा यांची राजकीयदृष्ट्या नाचक्की करण्याचा प्रयत्न केला आहे, असे धोंडगे समर्थकांना वाटते. 


...तर राष्ट्रवादीची अडचण?


एकूणच शंकरअण्णा धोंडगे नाराज असल्याची बाब हेरुन बीआरएसने एका शेतकरी नेत्याला जवळ करण्याचा प्रयत्न चालवला आहे. अर्थातच त्यांच्यावर बीआरएस प्रदेश पातळीवरची मोठी जबाबदारी टाकण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे जाऊन त्यांनी पक्षप्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान शंकरअण्णा धोंडगे हे बीआरएसच्या मोटारीत बसले तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांना ते बऱ्यापैकी अडचणी निर्माण करु शकतात, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.