Nanded News: एका शाळेत अस्वल शिरल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड (Nanded) जिल्ह्यातील वन परिक्षेत्र असलेल्या आदिवासी माहूर तालुक्यात घडला. रविवारी (16 जुलै) सकाळच्या सुमारास माहूर तालुक्यातील दिगडी तांडा या गावातील शाळेत अचानक अस्वल घुसला. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने कोणताही अप्रिय प्रकार घडलेला नाही. 


सुदैवाने रविवार असल्याने शाळेला सुट्टी होती, त्यामुळे कुठलीही धक्कादायक घटना घडली नाही. दुर्गम वन परिक्षेत्र असलेल्या दिगडी तांडा येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेची विद्यार्थी संख्या (Student Count) 17 आहे आणि शाळेच्या पाठीमागे शेती आणि वन परिक्षेत्र आहे. आज सकाळच्या सुमारास अचानक एक अस्वल शाळेच्या इमारतीत आला. शाळेभोवती कुठलीही संरक्षक भिंत नसल्याने सहज हा अस्वल शाळेत आला. अस्वल शाळेत आल्याचं काही ग्रामस्थांनी पाहिलं. एका ग्रामस्थाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात अस्वल शाळेत आल्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर अनेक लोक जमल्याने लोकांचा आवाज ऐकून अस्वल लगेच निघून गेला.


गावपाड्यात विद्यार्थांची संख्या कमी, तर पुण्यात शिक्षकच नाही


शिक्षणाचे माहेरघर अशी पुणे शहराची ओळख आहे. मात्र याच पुणे शहरात असलेल्या महापालिकेच्या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिक्षक नसल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे शिवाय विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. शाळेत येतो, पण शिकवायला शिक्षकच नाही तर मग आम्ही शिकणार कसं? असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करताना दिसत आहेत. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात कल्पना चावला इंग्लिश मीडियम स्कूल आहे. 200 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात आणि या सात वर्गांसाठी फक्त दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.


विद्यार्थ्यांची संख्या घटली


या शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे आता विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी होत चालली आहे. आधी या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 300 पेक्षा जास्त होती, मात्र आता ही 200 पर्यंत येऊन पोहोचली आहे. फक्त दोन शिक्षक असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे वर्ग एकत्रच भरवले जातात. म्हणजे दुसरीचे विद्यार्थी तिसरीच्या वर्गात चौथीचे विद्यार्थी पाचवीच्या वर्गात अशा प्रकारे विद्यार्थ्यांना एकत्र बसवलं जातं. त्यामुळे वर्गात नेमकं काय चाललंय? हेच विद्यार्थ्यांना कळत नाही आहे.


विद्यार्थीच बनले शिक्षक


शिक्षक नसल्यामुळे सातवीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थीच पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक बनतात, त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा ते प्रयत्न करतात. सातवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्यामुळे हे विद्यार्थी देखील दिवसभर येऊन वर्गात बसतात, मजा मस्ती करतात, तर काही विद्यार्थी पहिली दुसरी तिसरीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून शिकवतात.


हेही वाचा:


Nanded News : हातभट्टी चालवणाऱ्या हाताला मिळणार आता रोजगार; नांदेड जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम