मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे आता पुढची कार्यवाही पूर्ण होईल, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.


फडणवीस सरकारमध्ये या महामार्गाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याबाबत विचार सुरू होता. मात्र उद्धव ठाकरे सरकारने या महामार्गाला आता बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे निश्चित केले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई-नागपूर महामार्गाचे नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे असेल. बाळासाहेब ठाकरे यांचे राज्याच्या विकासात खूप महत्वाचं योगदान आहे. राज्यातला पहिला महामार्ग (मुंबई-पुणे महामार्ग) हा बाळासाहेबांच्या संकल्पनेतून आणि तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आला होता. बाळासाहेबांच्या राज्यातील योगदानामुळे आम्ही समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्यावे, अशी मागणी केली होती.

शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा राज्य आणि देशासाठी खूपच महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. राज्याच्या विकासामध्ये हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे. या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्यावं, अशी मंत्रीमंडळातील सर्वांची इच्छा होती. तशी मागणी केल्यानंतर ती पूर्ण करण्यात आली आहे. त्याची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल.