नागपूर: जर राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुबुद्धी आली असती, त्यांनी शिवसेनेसोबत मैत्री जपली असती तर कदाचित आज ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले असते असं वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. दक्षिण नागपूर परिसरात गजानन नगर मध्ये एका जाहीर सभेच्या माध्यमातून शिवसैनिकांना संबोधित करताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.


खासदार संजय राऊत हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या मातीत असे गुण आहे की तिथे गेल्यानंतर संजय राऊत यांना सुबुद्धी येईल असे वक्तव्य केले होते. तोच धागा पकडून संजय राऊत यांनी फडणवीस सुबुद्धीने वागले असते तर आज ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले असते असे वक्तव्य केलं. 


खा. संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले की, "नागपूरच्या मातीत राहूनही दुर्दैवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे, शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे, आपण त्यांच्या सोबत मैत्रीच्या नात्याने राहिलो पाहिजे अशी सुबुद्धी तुम्हाला त्यावेळी आली असती तर कदाचित आज आपण राज्याचे मुख्यमंत्री राहिला असता. मात्र, तुम्हाला तेव्हा दुर्बुद्धी सुचली आणि तुम्ही आम्हाला सुबुद्धीचे सल्ले देत आहात. कदाचित नागपूर भाजप नेत्यांना सुबुद्धीचा अजीर्ण झाला आहे.


खासदार संजय राऊत म्हणाले की, "नागपूर महानगरपालिकेमध्ये अनेक घोटाळे असताना नागपूरच्या नेत्यांना मुंबई महापालिकाच दिसत आहे. त्यांना मुंबई महापालिकेत शिवसेनेने काम केलेलं नाही असं दिसतंय. अरे काम केलं नसतं तर एवढी वर्षे सत्तेत राहिलो असतो का? आता नागपूर महानगरपालिकेचे रोज आणि घोटाळे बाहेर काढू आणि नागपूर महानगरपालिकेत शिवसेनेचे 25 नगरसेवक  निवडूण आणल्याशिवाय थांबणार नाही." 


महत्त्वाच्या बातम्या: