नागपूर :   राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात दमदार पावसामुळे नवेगाव खैरी, गोरेवाडा, नांद आणि वेणा या चार लहान आणि मध्यम धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कन्हान, पेंच, वेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यातील सावनेर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील नदी काठच्या गावांना येणाऱ्या काळात पुराचा धोका आहे. त्यामुळे या परिसरातील गावकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही कुही तालुक्यातील काही ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.


 सध्या पाऊस कमी प्रमाणात असला तरी अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये व गरजेनुसार सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, पाणी वाहत असताना पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.  दरम्यान, नागपूर जिल्ह्यात सध्या तरी एक ही नागरिकाला सुरक्षितस्थळी हलवण्याची वेळ आलेली नाही. मात्र, पूर परिस्थिती बिघडल्यास प्रशासनाने त्यासंदर्भात तयारी ठेवली असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.


आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात कोणतीही माहिती द्यायची असल्यास किंवा मदत आवश्यक असल्यास मदतीसाठी 0712-2562668 या क्रमांकावर किंवा टोल फ्री क्रमांक 1077 चा वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. काल दिवसभर नागपूर जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला.  रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु असल्यामुळे अनेक तालुक्यात सखल भागात पाणी साचले. 


विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या धापेवाडामध्ये चंद्रभागा नदीला पूर आले असून नदीचे पाणी ओसंडून वाहत आहे. चंद्रभागा नदीचे पाणी विठ्ठल मंदिराच्या परिसरातही शिरले आहे. तर सावनेर तालुक्यातील केळवद परिसरातील कपिलेश्वर मंदिर आणि त्याच्या अवतीभवती काल झालेल्या मुसळधार पावसानंतर मंदिराच्या अवतीभवतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले होते. पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल 164 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. सकाळी देखील पाऊस सुरु असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सिंचन विभागाने धरणाचे आठ दार उघडले असून त्यातून 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे... आजही जर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिला आणि पाण्याचा विसर्ग वाढवावा लागला तर संध्याकाळपर्यंत पेंच आणि कन्हान नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढून काठावरील वस्त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.


नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गोरेवाडा धरणाचे सर्व चार स्वयंचलित गेट उघडण्यात आले आहे. गोरेवाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे स्वयंचलित गेट आज सकाळपासून उघडले आहे. त्यामुळे पिवळी नदीची पाणी पातळी वाढली आहे.  परिणामी उत्तर नागपुरातील पिवळी नदीच्या काठावरील वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कामठी तालुक्यात ही दमदार पावसामुळे अनेक गावे आणि वस्त्याना पुराचा धोका निर्माण झाला आहे.  कामठी मधील येरखेडा परिसरात अनेक वस्त्या जलमय झाल्या आहेत. 


संबंधित बातम्या :


Almatti dam : कृष्णा, पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु 


Maharashtra Rains: पावसाचं धुमशान! आजही राज्यात अनेक ठिकाणी रेड अलर्ट, सतर्कतेचं आवाहन