नागपूर : नागपुरातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पटोले यांनी 23 मे रोजी त्यांच्या मोठ्या विजयाचा दावा केला आहे. नागपुरात प्रचारासाठी आलो तेव्हापासूनच मी 5 लाखांच्या मताधिक्याचा दावा करतोय आणि आजही त्यावर कायम असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.


विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वच्या सर्व 10 जागांवर विजय मिळेल, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान एक्झिट पोलच्या संकेतानंतर लोकांच्या मनात शंका निर्माण झाली असून निवडणुकांचे निकाल असेच एकतर्फी राहिले तर लोकांचा उद्रेक होईल, अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखविली.
विदर्भातील रंगतदार लढती, पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांचा आढावा

दरम्यान, कॉंग्रेसला नागपुरात भरपूर पाठिंबा मिळाला आहे, त्यामुळे विजय माझाच होईल, असे पटोले म्हणाले. विदर्भात काँग्रेस विचारांना जनतेचा भरपूर पाठिंबा मिळाल्याने विदर्भातील 10 पैकी 10 जागा आघाडी जिंकेल. तसेच महाराष्ट्रात इतर ही भागांमध्ये काँग्रेस आणि आघाडीच्या जागा वाढतील, असेही पटोले म्हणाले.

देशामध्ये मोदी सरकार विरोधात प्रचंड नाराजी होती, त्यामुळे राहुल गांधींच्या नेतृत्वात युपीएचे सरकार येईल, असेही ते म्हणाले. एक्झिट पोलच्या  संकेतांवर भरोसा नाही. एक्झिट पोल म्हणजे जनतेच्या भावनेची थट्टा आहे, असेही ते म्हणाले.

एक्झिट पोलचे निकाल पाहिल्यानंतर अनेक लोक फोन करून विचारत आहेत की आम्ही काँग्रेसला केलेले मतदान कुठे गेले? आमची मतं चोरली का? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत, असे ते म्हणाले.