नागपूर : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू मुंबईच्या दिशेने निघालेले असताना त्यांना नागपुरात रोखण्यात आलं होतं. त्यानंतर सुमारे दोन ते अडीच तासांनी बच्चू कडू आंदोलनासाठी मुंबईत जाण्यासाठी निघाले. "शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाण्यासाठी परवानगी दिल्याने मी सरकारचे आभार मानतो," अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी निघताना दिली.


कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर चार आठवड्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील जिओ ऑफिसवर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय ते बिकेसीमधील अंबानी, अदानीच्या कार्यालयावर हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना तसंच राज्यातील शेतकरी सामील होणार आहेत.


या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू सकाळीच नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघाले होते. परंतु यावेळी पोलिसांनी त्यांना मुंबईला जाण्यापासून रोखलं आणि नागपुरातच ठेवलं. ठाकरे सरकारमधील मंत्र्यालाच पोलिसांनी अडवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं.


परंतु मोर्चासाठी मुंबईला जाणारच असा बच्चू कडू यांचा निर्धार कायम होता. यानंतर काही तासांनी बच्चू कडू मुंबईला जाण्यासाठी निघाले. त्यावेळी तुम्हाला का रोखण्यात आलं असा प्रश्न माध्यमांनी त्यांना विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, "प्रशासनाचा गैरसमज झाल्याने सकाळी थांबवलं होतं. मी वरिष्ठांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की दुपारच्या विमानाने जाऊ शकता. मला परवानगी दिली म्हणून मी बाहेर पडतोय. मी सरकारचे धन्यवाद मानतो त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाण्यासाठी मला अनुमती दिली."


"मुंबईतील मोर्चा हा शांततेचा आहे, प्रतिकात्मक आहे. अंबानी, अदानी यांच्या इशाऱ्यावर मोदी सरकार चालत आहे. त्यामुळे त्यांना विनंती करणार आहे की आपणही मोदींजींना समजावून सांगितलं पाहिजे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा आणला पाहिजे," असंही बच्चू कडू यांनी यावेळी म्हणाले.


दरम्यान सकाळी झालेल्या खोळंब्यामुळे बच्चू कडू यांनी नागपूर ते मुंबई हे विमान चुकलं. आता पुण्याचं विमान गाठल्याचं कडू यांनी सांगितलं.


Bacchu Kadu | कृषी कायद्याविरोधात मुंबईतल्या जिओ हाऊसवर मोर्चाचं आयोजन; बच्चू कडूंना पोलिसांनी अडवलं