Ashish Deshmukh On Congress : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) पक्षाची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) या दोन बड्या नेत्यांना निवडणुकांच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता जवळ जवळ मावळली आहे. कारण नाना पटोले किंवा विजय वडट्टीवार यांना उमेदवारी दिल्यास ते मतदारसंघात अडकून राहतील असं काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचे म्हणणे आहे.


अशातच यंदा काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत 2014 आणि 2019 प्रमाणे नामुष्की ओढावून घ्यायची नाही, या इराद्याने काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रातील इतर संभाव्य उमेदवारांची चाचपणी सध्या सुरू आहे. त्यावरून आता भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी काँग्रेसवर बोचरी टीका करत नाना पाटोले आणि विजय वडट्टीवार स्वतःच्या पराभवाच्या भीतीने पळ काढत असल्याचे भाष्य केलंय. 


पराभवाच्या भीतीनेच 'ते' मैदानातून पळ काढताय


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील किंवा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील यांना आगामी निवडणुकांमध्ये स्वतःच्या पराभवाची प्रचंड भीती असल्याने ते निवडणुकांच्या मैदानातून आपला पळ काढत आहे. किंबहुना निवडणुकांमध्ये उमेदवार म्हणून ते लांब राहण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका आशिष देशमुख यांनी केली आहे. आजघडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या नेत्यांसह सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये पराजयाची मानसिकता तयार झाली आहे. म्हणूनच नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार लोकसभेच्या निवडणुकांच्या मैदानातून पळून जात आहे. असे असले तरी आम्ही राज्यात भाजप आणि महायुतीच्या 45 पेक्षा अधिक जागा जिंकणार असून विदर्भात देखील भाजपचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार असल्याचा विश्वास देखील आशिष देशमुख यांनी बोलताना व्यक्त केलाय.


नाना पटोले निवडणूक लढण्यास फारसे इच्छुक नाहीत? 


आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. असे असताना अद्याप महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) या मतदारसंघांसाठी एकाही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने नाराजीनाट्य बघायला मिळत असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. असे असताना नाना पटोले स्वत: निवडूक लढवण्यास फारसे उत्सुक नसल्याचे संकेत दिले आहे.


यावर स्वत: नाना पटोले यांनी भाष्य करत मला भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघापुरते मर्यादित करून अडकवून ठेवू नका, असं वक्तव्य त्यांनी केले आहे. यावेळी नाना पटोले यांनी कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं की, पक्षश्रेष्ठीकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवाराला सहकार्य करा आणि निवडून आणा. मला भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघापुरते अडकून पडण्याऐवजी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात फिरून जास्त खासदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे देखील नाना पाटोले म्हणाले. त्यामुळे पटोले हे काँग्रेसचे उमेदवार राहणार नसल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या