Mahayuti Seat Sharing Formula: महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला कसा ठरला, त्याचा खुलासा दस्तुरखुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे 13 खासदार घेऊन महायुतीत आलेत. शिवाय ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा योग्य सन्मान करून त्यांना योग्य जागा सोडणे हे क्रमप्राप्त आहे. सोबतच अजित पवार (Ajit Pawar), हे 42 आमदार घेऊन महायुतीत आले. त्यामुळे त्यांच्या पक्षाला प्रत्येक सहा आमदाराच्या मागे एक जागा त्यांना मिळावी,  या अनुषंगाने महायुतीमध्ये (Mahayuti) जागा वाटप करण्यात आल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. तर शिवसेनेचे उमेदवार निवडीबाबत किंवा उमेदवार बदली करण्याबाबत भाजपने कुठलाही हस्तक्षेप केल्या नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय. सोबतच महायुतीत राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे भाजपला कॉम्प्रमाईज करावा लागलं असेही ते म्हणाले. 


असा ठरला महायुतीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला


एकंदरीत राज्याच्या जागावाटपानुसार 34 जागा मिळाव्यात अशी प्रत्येकाची मागणी होती. मात्र एकनाथ शिंदे हे तेरा खासदार घेऊन महायुतीमध्ये सामील झाल्याने त्यांचा देखील सन्मान व्हावा, शिवाय ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या सन्मान करणे हे क्रमप्राप्त आहे. तर अजित पवार 42 आमदार घेऊन महायुतीत सामील झाले आहेत. तर त्यानुसार त्यांना योग्य आणि समाधानकारक जागा सुटाव्यात हा आमचा हेतू होता. ज्यावेळी आपण मोठ्या भावाच्या भूमिकेत जातो, त्यावेळी बऱ्याच गोष्टींची तडजोड आणि सामंजस्यपणा आपल्याला दाखवावा लागतो. तसें संस्काराचं आपल्या घरात किंवा सामाजिक जीवनात दिले जातात. त्यामुळे कुठे काही अंशी तडजोड केल्यास काहीही हरकत असायचे कारण नाही. शिवाय आमचे लक्ष ठरले असल्याने आम्ही त्या दिशेने एकदिलाने मार्गक्रमण करत असल्याचेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 


मित्र पक्षाच्या बाबतीत कुठलाही हस्तक्षेप नाही 


पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीतील मित्र पक्षांच्या जागावाटपासंदर्भात अथवा तेथील उमेदवार निवडत असताना भाजपच्या वतीने कुठेही निरोप, सूचना किंवा त्या संदर्भात कुठलाही हस्तक्षेप करण्यात आलेला नाही. केवळ आमचे असे म्हणणे होते की, काही ठिकाणी जे विद्यमान खासदार आहेत, त्यांना पुढच्या वेळी दुसरी कुठली संधी देता येईल. कुणाचेही मन न दुखवता प्रत्येकाला सन्मान देत नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. असे एक मत होते आणि त्यावरही आम्ही एकत्रितरित्या चर्चा करून त्यावर तोडगा काढला. मात्र उमेदवार बदलीमध्ये भाजपकडून कुठलाही हस्तक्षेप न केल्याची स्पष्टोक्तीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलतांना दिलीय. 


'या' गोष्टीचा फार अभिमान आणि आनंद 


मला याची जाणीव आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीला साथ दिल्याने काही जागांमध्ये आम्हाला तडजोड करावी लागली. असे असले तरी आम्हाला त्याबाबत कुठलीही तक्रार अथवा असमाधान नाही, असे  सर्व भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यानुसार आता प्रचंड ताकदीने सर्व महायुतीतील कार्यकर्ते कामालाही लागले आहेत. मला या गोष्टीचा फार अभिमान आणि आनंद आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्याच्या उद्देशाने महायुतीतील प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी आणि नेतेमंडळी पूर्ण ताकतीनिशी कामाला लागले आहेत. सर्वांनी एका व्यासपीठावर येऊन एकादीलाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीतील प्रत्येक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प आम्ही केला आहे आणि त्यात आम्हाला यशही येईल, असा विश्वासही बावनकुळे यांनी बोलताना व्यक्त केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या