नागपूर : नागपूर महापालिकेत पाणी पुरवठ्यावरुन घाणेरडं राजकारण केलं जात असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नगरसेवकांनी केला आहे. राज्यासह नागपूरमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झालेली आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे, तर विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये अत्यल्प पाणीपूरवठा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळेच नागपुरातील लोकांनी जलत्याग आंदोलन सुरु केले आहे.


नागपूर महापालिका शहरातील पाणी समस्येबद्दल गंभीर नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पूर्व नागपुरातील अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांच्या नेतृत्वात सतरंजीपुरा परिसरात महापालिकेच्या कार्यालयात कालपासून (शुक्रवार) जलत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

शहरात पाणीप्रश्न गंभीर असताना महापालिकेतील भाजप नेते त्यावर चर्चा करायलादेखील तयार नाहीत. माहपौर महापालिकेच्या सभेत पाणीप्रश्नावर बोलण्यास टाळटाळ करतात. पाणीपुरवठा वाटपाबाबत आमच्या प्रभागावर अन्याय होत असल्याचा आरोप आभा पांडे यांनी केला आहे.

पांडे यांनी सुरु केलेल्या जलत्याग आंदोलनात सतरंजीपुरा, शांतीनगर, लालगंज, प्रेमनगर, बस्तरवाडी, कळमना अशा अनेक वस्त्यांमधील लोक सहभागी झाले आहेत. तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांनीही या आंदोलनात सहभागी होण्यास सुरुवात केली आहे.