मुंबई : न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातीयतेचा वास येतो असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar)  गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरतूद न करुन बाबासाहेबांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला, असं आव्हाड म्हणाले. नागपुरात (Nagpur News)  एका कार्यक्रमात ते बोलत होते. आज न्यायपालिका निष्पक्ष नाही... असं आव्हाड काल म्हणाले.  मात्र आपण असं वक्तव्य केलेलं नाही असं म्हणत आव्हाडांनी स्पष्ट शब्दात इन्कार केलाय. काल नागपुरात बोलताना आव्हाडांनी हे वक्तव्य केलं होतं. मी कुठेही न्यायपालिकेच्या निर्णयात जातीयतेचा वास येतो असे बोललेलो नाही, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आज पूर्णपणे घुमजाव केला आहे.


जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आता टीकेची झोड उठत आहे. ज्युडिशिअरीमध्ये आरक्षण न देण्याचं धोरण बाबासाहेबांची पूर्ण चिंतन करून आखलं आहे. त्यावर भाष्य करणं अयोग्य आहे असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सुशीलकुमार शिंदे यांनी सुनावलंय. तर आव्हाड बाबासाहेबांपेक्षा मोठे विचारवंत झाले का असा सवाल भाजप नेते आशिष देशमुख यांनी केलाय. तर पणन मंत्री अब्दुल सत्तारांनीही आव्हाडांवर टीका केलीय.


जितेंद्र आव्हाडांनी आंबेडकरी जनतेला दुखावण्याचे काम केलंय : आशिष देशमुख 


जितेंद्र आव्हाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून आंबेडकरी जनतेला दुखावण्याचे काम केलंय अशी टीका भाजप नेते आशिष देशमुख यांनी केली आहे.  जितेंद्र आव्हाड नैराश्याने ग्रासले असून चर्चेत राहण्यासाठी ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत असंही ते म्हणालेत. 


काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?


 बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायपालिकेमध्येही आरक्षण ठेवायला हवं होतं. माहीत नाही, मी हे बोलावं की नाही.. कारण उगाच वाद निर्माण होईल. मात्र तरीही बोलतो असे सांगून आव्हाड यांनी जातीय दृष्टीकोनातून न्यायपालिकेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायपालिकेमध्येही आरक्षण असायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली. न्यायपालिकेचे काही निर्णय असे असतात की ते पाहून लगेच त्यातून जातीयतेचा वास येतो.मात्र, न्यायपालिकेतून असे मुळीच अपेक्षित नाही. न्यायपालिका निष्पक्ष राहिली पाहिजे अशी राज्यघटनेची अपेक्षा आहे. मात्र, खरंच असे आहे का असा सवाल ही आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला.  



 


 


हे ही वाचा:


न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जातीव्यवस्थेचा वास येतो, जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान