नागपूर : भारत स्पोर्ट्स लव्हिंग (sports loving) देश आहे, मात्र स्पोर्ट्स प्लेयिंग (sports playing ) देश नाही. भविष्यात मात्र भारत स्पोर्ट्स प्लेयिंग देश झाला तर मला खूप आनंद होईल असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले. सचिन नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.


भारत सर्वात युवा देश असल्याचे नेहमीच म्हटले जाते मात्र, आजच्या युवा पिढीसमोर अनेक आरोग्य विषयक समस्या आहेत. देशाची मोठी संपत्ती आजारपणावर खर्च होते आहे. जर युवावर्ग क्रीडा प्रकारांकडे वळला तर आजारपणावर खर्च होणारा तोच निधी विधायक कामांमध्ये वापरता येईल असे सचिन म्हणाला.

कार्यक्रमात सचिनच्या हस्ते गेल्यावर्षी रणजी चषक जिंकणाऱ्या विदर्भाच्या क्रिकेट टीमचा सत्कार करण्यात आला. विदर्भाच्या रणजी टीमने काही दिवसांपूर्वी मुंबईला हरवले होवे. यावेळी विदर्भाची क्रिकेट टीम रणजी चॅम्पियन झाल्याचा मला आनंद आहे. मात्र, रणजीची फायनल नागपूरला झाली असती तर आणखी आनंद झाला असते असे सांगून सचिनने रणजी ट्रॉफीची फायनल मॅच दोन्हीपैकी एका टीमच्या होम ग्राउंडवरच झाली पाहिजे असे सुचविले.

नागपुरातील खासदार क्रीडा चषकाच्या या क्रीडा महोत्सवात विविध 27 क्रीडा प्रकारात सुमारे 42 हजार खेळाडू सहभागी होत आहेत. या वर्षी सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल 72 लाख रुपयांची रोख बक्षीसं देण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाच्या अखेरीस मंचावर नितीन गडकरी यांनी सचिन तेंडुलकर यांच्यात क्रिकेटचा सामना रंगला. यावेळी गडकरींनी टाकलेला प्रत्येक बॉल सचिनने प्रेक्षकांमध्ये टोलावला.