नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कोरोना परिस्थितीवरुन सुनावणी सुरु आहे. या संदर्भात आज राज्य सरकारने त्यांचं प्रतिज्ञापत्र न्यायालयापुढे सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे. मात्र, त्याच वेळेस या प्रकरणात न्यायालयीन मित्र असलेल्या वकिलाने राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले. आरोग्यमंत्री ज्या जालना जिल्ह्यातून येतात त्या जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा 35 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचे जास्त वाटप झाल्याचा आरोप आज न्यायालयात झाला.


त्यानंतर न्यायालयाने उद्याच्या सुनावणीच्या वेळेला एफडीए नोडल अधिकाऱ्याला जातीने न्यायालयात उपस्थित राहून गेल्या काही दिवसात राज्यभरात किती रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप झाले असून त्यातून कोणत्या जिल्ह्याला किती वाटा मिळाला आहे? याचा संपूर्ण तपशील न्यायालयापुढे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे उद्या सरकारने वाटप करताना काय निकष वापरले हेही कोर्टाला सांगायचं आहे, ज्याची वाट महाराष्ट्रही पाहत आहे.


याशिवाय रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार संदर्भातल्या एका दुसऱ्या याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने असा काळाबाजार रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कठोर पावले उचलावीत असे निर्देशही दिले आहे.