नागपूर : सत्ताधाऱ्यांनी लोकांच्या जमिनी रामदेव बाबाला कवडीमोल भावाने विकल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. आज नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. पटोले म्हणाले की, "सत्ताधारी नागपुरात उद्योगधंदे आणल्याचा दावा करतात, परंतु त्यांनी केवळ इथल्या जमिनी रामदेव बाबाला दिल्या. जे उद्योगधंदे नागपुरात आले ते ज्येष्ठ काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी आणले", असा दावा पटोले यांनी केला आहे.


पटोले म्हणाले की, "गडकरींच्या आशीर्वादाचे मी स्वागत करतो. ते माझे मोठे बंधू आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मी नागपूर लोकसभा निवडणूकीत विजयी होईन." नाना पटोले यांनी भाजपला रामराम करुन काँग्रेस प्रवेश केला, त्यानंतर याबाबत प्रतिक्रिया देताना केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, "नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत," यावर पटोले यांनी आज उत्तर दिले आहे.

पटोले यांनी नागपुरातल्या रस्त्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पटोले म्हणाले की, "सत्तधारी दावा करतात की, त्यांनी सिमेंटचे रस्ते बनवले, परंतु असा एक रस्ता दाखवा की जिथे लोकांच्या घरात पाणी शिरत नाही. नागपुरात काय कामं केली, त्याची गडकरींनी श्वेतपत्रिका जाहीर करावी", अशी मागणी पटोले यांनी मांडली आहे.

संबधित बातमी आणि व्हिडीओ : नाना पटोलेंनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही : नितीन गडकरी