नागपूर : महायुतीत (Mahayuti) भाजपसोबत (BJP) सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Ajit Pawar Group) काही मंत्री विदर्भात भाजपपेक्षा महाविकास आघाडी सरकार काळात असलेल्या मंत्र्यांना साथ देत असल्याचा गंभीर आरोप विदर्भातील भाजप नेत्याने केला आहे. यामुळे महायुतीत पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे दोन मंत्री विदर्भात भाजप नेत्यांऐवजी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) माजी मंत्रांना साथ देतात, असा अत्यंत गंभीर आरोप भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे. 


धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटलांवर गंभीर आरोप


नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सहकार कायद्यानुसार आरोपी सुनील केदार (Sunil Kedar) आणि इतर दोषी संचालकांकडून प्रस्तावित वसुलीच्या प्रकरणात दिलीप वळसे पाटील वारंवार सुनावणी टाळून सुनील केदार यांना साथ देत आहेत. सोबतच कृषी मंत्री धनंजय मुंडे अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून निर्णय करत असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  


भाजपच्या श्रेष्ठींना सांगूनही काहीच होत नाही


12 सप्टेंबर रोजी विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रालयात एक विशेष बैठक बोलावण्यात आली होती. मात्र अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या दबावाखाली धनंजय मुंडे यांनी ती बैठक अचानक रद्द केली. त्यामुळे कृषी मंत्री असूनही धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांच्या हिताची काळजी नाही, उलट ते आपले पूर्वीचे सहकारी अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून काम करत आहेत.  भाजपच्या श्रेष्ठींना यासंदर्भात सांगूनही काहीच होत नाही. दिलीप वळसे पाटील तर सुनील केदार यांच्या प्रकरणी आमच्या श्रेष्ठींचाही ऐकत नाही, असे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. आता यावर धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


विधानसभेपूर्वी काँग्रेसला हादरा, आणखी एक आमदार भाजपमध्ये जाणार? गडकरींच्या भेटीनंतर घडामोडींना वेग


मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?