वर्धा: वर्धा येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे आपल्या बहिणीला प्राण गमवावे लागले, असा आरोप प्रसिद्ध विनोदी कलाकार सुनील पाल यांनी केला होता. मात्र पाल यांनी केलेले आरोप फेटाळून लावत त्यांच्याविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यासह कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. सुनील पाल यांच्या बहिणीचं निधन झाल्यानंतर त्यासंदर्भात त्यांनी सावंगी इथल्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या आयसीयूचा व्हिडीओ पाल यांनी व्हायरल केला होता.


सुनील पाल यांनी बहिण शारदा पाल यांच्यावर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापूर्वी त्यांच्यावर हिंगणघाटच्या रुग्णालयात उपचार करण्यात आलेत.. बुधवारच्या पहाटे 3 वाजता त्यांना दवाखान्यात आणण्यात आले. गुरुवारी मात्र त्यांचे भाऊ भेटायला आले असताना उपचार होत नसल्याचे आरोप करत व्हिडीओ व्हायरल केला. त्या नंतर बहिणीला नागपूरच्या रुग्णालयात उपचारार्थ नेले. तिथं त्यांचा मृत्यू झाला.

या कालावधीत पाल यांनी सावंगी रुग्णालयातील आयसीयूतील व्हिडीओ बनवून रुग्णालयाच्या हलगर्जीनं बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. या विरोधात आता रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं आहे. पाल यांच्याविरोधात सायबर सेलकडेही तक्रार करणार असल्याचे प्रशासनाने म्हटलं आहे. आयसीयूतील डॉक्टरचं एमबीबीएस झालं असून, एमडीच्या द्वितीय वर्षाला असल्याचं रुग्णालय प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

रुग्णालयाच्या हलगर्जीमुळं बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप सुनील पाल यांनी केला होता. त्याबाबतचे व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल केले होते. त्याला प्रत्युत्तर देत सावंगी रुग्णालयानेही त्यांची बाजू मांडणारे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत. त्यामध्ये रुग्णालयाची बाजू मांडण्यासह रुग्णालयात उपचार घेत असलेले, तेथून बरे झालेल्या रुग्णांच्या मुलाखती सोशल मिडीयावर मांडल्या जात आहेत.

पाल यांच्या बहिणीला सुरुवातीला हिंगणघाट येथे उपचार करुन आणले होते. 'पॅनक्रिअॅटीस' या आजाराने त्यांची बहीण त्रस्त होती. त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले. आयसीयूत प्रशिक्षित डॉक्टर होते, उपचारात हलगर्जी केली नसल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे.