Navi Mumbai News : प्रियकर-प्रेयसीमधील लग्न करण्यावरुनचा वाद इतका विकोपाला गेला की प्रियकराने गळा दाबून थेट प्रेयसीचा जीव घेतल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. नवी मुंबईच्या तुर्भे येथील साई प्रणव लाॅजवर एक प्रेमीयुगल आलं होतं. रात्रीच्या वेळी दोघांमध्ये वाद सुरू असल्याचा आवाज येत होता. यानंतर हॅाटेल मालकाने पोलिसांना बोलवून घेत रूममध्ये प्रवेश केला असता त्या ठिकाणी तरूणी बेशुध्द अवस्थेत पडल्याचे दिसून आले. या वेळी रूम मध्ये असलेला आरोपी सागर कांबळे याला पोलीसांनी ताब्यात घेतले. संबंधित तरूणीला रुग्णालयात दाखल केले असता ती मृत झाल्याचे डाॅक्टरांकडून सांगण्यात आले.


आरोपी सागर कांबळे हा कल्याणला राहणारा असून त्याची प्रियसी प्रतिभा ही मुलुंड येथे राहण्यास होती. 23 फेब्रुवारीला दोघेही तुर्भेतील साई प्रणव लॉज वर आले होते. दोघांचे चार वर्षांपासून प्रेम संबंध होते. अशातच प्रतिभा ही सागरकडे वारंवार लग्नाची मागणी करत होती त्या मागणीला सागर हा चालढकल करण्याचा प्रयत्न करत असल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.


काही वेळाने वाद शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने राग अनावर झाल्यावर सागर कांबळे याने प्रतिभाचा गळा आवळून हत्या केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. एपीएमसी पोलीसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने आरोपी सागर कांबळे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून एपीएमसी पोलीस पुढील तपास करत आहेत.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha