मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे. त्यावर आज शिवसेनेचे नेते संजय राऊत विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. शरद पवार यांनी भूमिका घेतल्यास त्यावर मिडियानं चिंता करायची गरज नाही. पवारांचे विधान निरर्थक नसते, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. पवार साहेबांनी असं सांगितलंय की, मुंबई पोलिसांवर त्यांचा विश्वास आहे. तुम्ही सीआयए, केजीबी, मोसादकडून तपास करावा, त्यांनी सीबीआयला आमंत्रण दिलेलं नसल्याचं राऊत म्हणाले.


या प्रकरणात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव कुठंही येत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोठ्या कुटुंबातील नाव घेवून सनसनाटी निर्माण केली जात असल्याचं राऊत यांनी म्हटलं. पार्थ पवार यांच्या भूमिकेवर मी कसं बोलणार? त्यावर त्यांचे सर्वोच्च नेते बोललेत, असं सांगत पार्थ पवार यांच्या प्रकरणावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.

हे प्रकरण अगोदरच सीबीआयकडं गेलंय

हे प्रकरण अगोदरच सीबीआयकडं गेलंय. तात्रिकदृष्टया हा तपास सीबीआयकडं आहे, राज्यांच्या अधिकारांवर हे अतिक्रमण असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. पण, आम्ही घाबरणारे आहोत का? सरकार बनवताना प्रयत्न झालेत ना? आम्ही गुडघे टेकणारे नाही, गुडघे फोडणारे आहोत, असेही राऊत यांनी सांगितले.

..म्हणून आदित्य ठाकरे यांना मान : राऊत
पद्म पुरस्कार समितीवर इतर पक्षाचेही सदस्य आहेत. विरोधकांनीही शिफारशी पाठवाव्यात. पात्रता कोण ठरवणार? त्यावर समुद्रमंथन करावं लागेल. ते कॅबिनेटचे सदस्य असल्यानं त्यांना मान दिला असल्याचे राऊत म्हणाले.

सगळे पूल व्यवस्थित आहे, पाऊस कमी आहे. हे सरकार पाच वर्षे टिकणार. आम्हाला दोघांनाही काही काम नाही. सरकार टिकवणं, ढकलण हे आमचं कामच आहे. जर कुणी स्वगृही परतत असेल तर स्वागत आहे. राज्याच्या राजकारणात चांगली गोष्ट आहे. 170 आमदार पाठिशी आहेत, यापेक्षा आमदारांची सध्या गरज नाही, असे म्हणत सरकार मजबूत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Exclusive | सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती

काय म्हणाले आशिष शेलार?
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांची क्षमतेवरवर नाही तर तपासाच्या दिशेवर प्रश्न आहे. त्यामुळे सीबीआय चौकशी व्हावी ही आमची आग्रही भूमिका आहे. सीबीआय चौकशीची योग्य मागणी पार्थ पवार यांनी केली, आमचा त्याला पाठिंबाच आहे. तसेच शरद पवार यांच्या वक्तव्यात अंतिमतः ते सीबीआय चौकशी नाकारण्याचं कारण नाही असं म्हणतायत. याचा गर्भित अर्थ त्यांचा सीबीआय चौकशीला समर्थनच आहे असं आम्ही समजतो. 'देर आए, दुरुस्त आए', त्यामुळे आता तरी त्यांच्या सरकारने आणि गृह मंत्र्यांनी सुप्रीम कोर्टात हीच भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेवरुन महाविकास अघाडित कुरघोडी सुरुय हे स्पष्ट करणारी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये सीबीआय चौकशीला विरोध एक पक्ष करतोय की सरकार करतेय हा खरा संभ्रम आहे. कुठलंही वक्तव्य करून "मै हू ना" हे दाखवण्याची वेळ जयंत पाटलांवर आलेली आहे. त्यामुळे आमच्यावर टीका करण्याखेरीज त्यांना पर्याय नाही. भाजप यामध्ये कुठलीही राजकीय संधी बघत नाही. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात न्याय मिळावा हीच आमची भूमिका, असल्याचे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले होते.

Sanjay Raut PC | शरद पवार यांचं कोणतंही वक्तव्य निरर्थक नसतं : संजय राऊत