Worli Hit And Run Accident: मुंबई मुंबईतील वरळीत (Worli Hit And Run) असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ आज सकाळी हिट अँड रनची घटना घडली. पुण्यातील कल्याणीनगरमधील हिट अँड रन केसने संपूर्ण देशाला हादरा दिला. त्यानंतर आता मुंबईतल्या वरळीतून हिट अँड रन च्या घटनेनं मुंबई हादरली आहे. यात एका महिलेनं तिचे प्राण गमावले आहेत. तर कार चालकानं घटनास्थळावरुन पळ काढला. आरोपी कार चालक शिंदे गटाचे (Shinde Group) पालघरमधील उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) यांचा मुलगा मिहीर शहा असल्याचं समोर आलं आहे. सध्या मिहीर शहा (Mihir Shah) फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर वडील राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


सध्या वरळी हीट अँड रन प्रकरात नवनवे खुलासे होत आहेत. घटनाक्रमानुसार मिहीर शहा हा रात्री जुहू येथील एका बारमध्ये मध्यप्रशन करत होता. त्यानंतर तो गोरेगावला गेला होता. घरी गेल्यानंतर त्याने आपल्या ड्राइवरला लाँग ड्राईव्हला जाण्याचे सांगितले. प्रवासादरम्यान तो मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शहा हा स्वतः गाडी चालवत होता. त्याच वेळी अट्रिक मॉलजवळ अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. अपघाताची घटना घडली तेव्हा मिहीर शहाने मध्यप्रशन केले होते, अशी माहिती समोर आली. याबाबत आता वाइस ग्लोबल बारचे मालक करण शहा यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.


बार मालकाने काय सांगितले?


वाइस ग्लोबल बारचे मालक करण शहा यांनी माहिती दिली मिहीर शहा काल रात्री 11.08 वाजता चार मित्रांसह मर्सिडीज कारमधून बारमध्ये आला होता. त्यांच्यासोबत कोणतीही मुलगी नव्हती आणि बिल भरल्यानंतर रात्री 1.28 ला मर्सिडीजला कारमधून बाहेर निघून गेले. सर्वांनी एक एक बिअर प्यायली, त्यावेळी चौघेही नॉर्मल होते, ते मर्सिडीजमध्ये आले आणि मर्सिडीजमध्ये निघाले, घटना बीएमडब्ल्यूमध्ये घडली. 


पोलीसांकडून सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त-


पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केला आहे. पोलिसांना हवी असलेली सर्व माहिती आम्ही दिली आहे. मिहिर शाहचे बिल 18730 रुपये होते, बिल त्याच्या मित्राने भरले होते, मिहिरचे ओळखपत्र तपासले आणि एंट्री दिली गेली, तो 28 वर्षांचा आहे, असं बार मालक म्हणाले.


नेमकं काय घडलं? 


अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकानं गाडी पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेलं. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं.



संबंधित बातम्या:


वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात, मुख्य आरोपी फरार, शिंदे म्हणाले...


वरळीत हिट अँड रनची घटना; आदित्य ठाकरे थेट पोलीस स्थानकात, राजकीय रंग न देण्याचं आवाहन