मुंबई: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता जर मुंबईत  मास्क न घातल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेनं मास्क मार्शलना दंडात्मक कारवाईची कडक अंमलबजावणी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


राज्यात आणि मुंबईमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याचं चित्र आहे. त्यामुळे मुंबईत क्लीन अप मार्शलकडून मास्क न घातल्याबाबतची कारवाई आता थंडावणार आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून मास्क मुक्ती घोषित झालेली नाही. त्यामुळे मास्क लावावाच लागणार आहे. पण दंडात्मक कारवाईमध्ये शिथिलता येणार आहे.


विनामास्क फिरणाऱ्या मंबईकरांकडून आतापर्यंत अंदाजे 120 कोटींची दंडात्मक रक्कम जमा करण्यात आली आहे. 


मुंबईतील वॉर्डनिहाय मास्क मार्शलची कंत्राटे आता संपुष्ठात येत आहेत. त्यामुळे आता नव्या एजन्सीकरता मुंबई महापालिकेकडून निविदा काढल्या गेल्या आहेत. 24 वॉर्डमध्ये 24 वॉर्डनिहाय एजन्सी ऐवजी मुंबईत आता केंद्रीय एजन्सी नेमून नवे मार्शल नेमले जातील अशी माहिती आहे.


दंड परत करा, हायकोर्टात याचिका
दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून बेकायदेशीरपणे वसूल केलेला दंड परत करा, अशी मागणी करत हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच बेकायदेशीरपणे लॉकडाऊनचे निर्बंध लादत केलेल्या नुकसानाची भरपाई म्हणून 5 कोटी रूपयांचा दावा फिरोझ मिठबोरवाला यांनी या याचिकेतून केला आहे. इतकंच काय तर असे बेकायदेशीर निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करत कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.


संबंधित बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha