Maharashtra Rain News : ऑक्टोबरमध्ये पावसाची रिमझिम सुरुच आहे. आजही मुंबई, ठाणेसह राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. शनिवारी संध्याकाळपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजही अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता, त्यानुसार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.


आज पावसाचा 'यलो अलर्ट'


मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टीवर पावसाची हजेरी पाहायला मिळत आहेत, यामुळे उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने मुंबईसह ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणात आज 'यलो अलर्ट' असल्याने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्री वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने वातावरणात बदल जाणवत आहे. 


आठवडाभरात मेघगर्जनेसह पाऊसाची शक्यता


मुंबईसह कोकणात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुंबईसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी उशिरा मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होते. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच हा आठवडाभर पावसाचा अंदाज कायम आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे आठवडाभरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


मुंबई, ठाण्यात पावसाच्या सरी


राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रात आतापर्यंत अपेक्षित सरासरीपेक्षा चार टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील काही भागात पावसाची सरासरी नोंद कमी असल तरी मुंबई शहरात यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला, तर मुंबई उपनगरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला असून सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तसेच, पालघर जिल्ह्यातही अतिवृष्टीची नोंद झाली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.